मुंबई : राज्याच्या निवडणुकांनंतर राज्यात मुख्यमंत्रीपदावरून सुरू झालेला सत्तास्थापनेचा तिढा आजपर्यंत कायम आहे. त्यातच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. एकीकडे शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी सत्तास्थापनेसाठी पुढाकार घेतला असला तरी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे सत्तास्थापनेचा पेच अद्यापही सुटल्याचे दिसत नाही. अशातच संजय राऊत यांनी राज्यात शिवसेनाच सरकार स्थापन करेल असा विश्वास व्यक्त करत शिवसेनेच्या मनात सत्तास्थापनेबाबत कोणताही गोंधळ नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
एनडीएतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेने विरोधी बाकावर बसून भाजपवर हल्लाबोल सुरू केला आहे. त्यातच भाजपाच्या अंताची सुरूवात ही महाराष्ट्रातूनच सुरू होणार असल्याचा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. सत्तास्थापनेचा गोंधळ हा शिवसेनेच्या मनात नाही. तो केवळ माध्यमांच्या मनात आहे, असे म्हणत राऊत यांनी माध्यमांवरही टीका केली. 2014 मध्ये युती तुटली होती. त्यानंतर आम्हाला युतीत जायची इच्छा नव्हती. भाजपाने त्यांचा सर्वात मोठा मित्रपक्ष गमावला आहे. भाजपाच्या अंताची सुरूवात ही महाराष्ट्रातूनच होणार आहे. येत्या काळात भाजपाला याची मोठी किंमत चुकवावी लागेल. राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल आणि त्याचं नेतृत्व हे शिवसेनाच करेल असा विश्वासदेखील यावेळी त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेच्या नेतृत्वाखालीच स्थिर सरकार स्थापन होईल आणि यासाठी कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. आम्ही विधीमंडळात बहुमत सिद्ध करताना 170 जणांचा पाठिंबा दाखवून देऊ. राष्ट्रपती शासन हे सहा महिन्यांसाठी लागू झाले आहे. ते संपण्यापूर्वी राज्यात सरकार स्थापन होईल, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी सामनातील संपादकीयचाही उल्लेख केला. आम्ही संपादकीय मधून सत्य मांडलं आहे. महाराष्ट्रात भाजपाला उभं करण्याचं काम शिवसेनेनं केलं, असंही राऊत यावेळी म्हणाले. आम्हाला एनडीएतून बाहेर काढणारे तुम्ही कोण? असा सवाल शिवसनेकडून सामनाच्या संपादकीय मधून केला आहे.