मुंबई – उच्च न्यायालयात उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील बीकेसी येथील मैदानावर मेळावा घेण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत.
मुंबईतल्या छत्रपती शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होणार आहे. यासाठी मुंबईतून प्रत्येक शाखेतून चार बसेस निघणार आहेत. मुंबईत एकूण 227 शाखा आहे, म्हणजे एकूण 908 बस या मुंबईतल्याच असणार आहेत. मुंबईतून ठाकरेंना यंदा 50 हजारपेक्षा जास्त गर्दी अपेक्षित आहे. त्यासाठी मुंबईतल्या विभागप्रमुखांनी आपली ताकद पणाला लावली आहे.
अशातच यंदा शिंदे गटाचा देखील मेळावा होणार असल्यानं कोणाच्या दसरा मेळाव्याला किती गर्दी होणार यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. यावरून शिवसेना उपनेत्या निलम गोऱ्हे यांनी शिंदे गटाला जोरदार टोला लगावला आहे.
निलम गोऱ्हे म्हणाल्या,’दसरा मेळाव्याला आम्हाला गर्दी जमवण्याची गरज नाही. झेप घेताना गरूड स्वत:ला जशी पाहिजे तशी झेप घेतो असं गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. ज्यांना सभेला गर्दी जमवायची आहे त्यांनी ती जमवावी, त्यासाठी प्रयत्न करणं हे त्यांचं काम असल्याचा टोलाही गोऱ्हे यांनी शिंदे गटाला लगावला आहे.