नवी दिल्ली: राज्यातल्या विरोधी पक्षाच्या नेत्याने केंद्रातल्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणं ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेटही त्याच स्वरुपाची आहे. त्याचा महाराष्ट्रातील आघाडी सरकार पाडण्याचा किंवा सरकार अस्थिर करण्याचा काहीच संबंध नाही, असे सांगतानाच आम्हाला सरकार पाडण्याशी काहीही घेणे देणे नाही. आम्ही 2024 च्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे, असे भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.
राज्यातील आघाडी सरकार जन्माला आल्यापासून अस्थिर आहे ही अनैसर्गिक युती आहे. विषम युती आहे. जनतेलाही ही युती मान्य नाही. त्यामुळे जनता 2024 च्या विधानसभा निवडणुकीची वाट पाहत आहे. या सरकारमध्येच वाद आहेत. त्यामुळेच ते जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सांगतानाच आम्ही सरकार पाडण्याचा दावा कधीच केला नव्हता. आमच्या कोणत्याही नेत्याने असे विधान केले नाही. गेल्या सहा महिन्यात तर नाहीच नाही, असा दावाही त्यांनी केला.
रावसाहेब दानवे यांनी यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले. विरोधी पक्षनेत्याने केंद्रातील नेत्यांना भेटणं ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. देवेंद्र फडणवीसांचे दिल्लीतील नेत्यांच्या भेटी घेण्याशी सरकार पाडण्याचा काहीच संबंध नाही. पक्ष वाढीसाठी या भेटी असतात. सरकार पाडण्याचा आमचा हेतू नाही. आम्ही सरकार पाडण्याच्या नादात नाही. राज्यातील सत्ताधारीच सरकार पाडण्याच्या वावड्या उठवून संभ्रम निर्माण करत आहेत, असा दावा दानवे यांनी केला.
बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी केलेली युती ही नैसर्गिक युती होती. जनतेला मान्य असलेली युती होती. त्यामुळे आता आम्ही शिवसेना आमच्यासोबत येईल की येणार नाही, जनता आमच्यासोबत येणार की नाही येणार या विचारात वेळ घालवणार नाही. आम्ही 2024च्या तयारीला सुरुवात केली, असे त्यांनी स्पष्ट केले.