मुंबई – शिंदे फडणवीस सरकारने आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगणाऱ्यांना पेन्शन देण्याचा निर्णय जाहीर केला यावर आता शिवसेनेने भाष्य केलं आहे. मुळात बाळासाहेबांना ही पेन्शनबाजी मान्य नसल्याचे शिवसेनेने आपले मुखपत्र असलेल्या सामनात म्हंटले आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखात नव्या सरकारच्या अनेक निर्णयावर फिल्मी स्टाईलने टीका देखील करण्यात आली आहे.
शिंदे-फडणवीस यांचे सरकार अस्तित्वात नाही. ‘एक दुजे के लिये’ चित्रपटातील ‘वासू-सपना’ या प्रेमवीरांप्रमाणे हे दोघेच फिरतात, मजा मारतात, गाणी गातात, बागडतात. एकंदरीत त्यांच्या जीवनात नव्याने फुलबाग बहरली आहे, पण चित्रपटाच्या पडद्यावरील वासू-सपनाचे प्रेम अस्सल होते. तसे या वासू-सपनाचे आहे काय? असा सवाल सामनामधून विचारण्यात आला आहे.
काय म्हटलंय नेमकं सामनात
फडणवीस-शिंदे यांचे सरकार म्हणे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालले आहे. आणीबाणीविरोधात लढणाऱ्यांचे मानधन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय या जोडगोळी सरकारने घेतला. मुळात बाळासाहेबांना ही ‘पेन्शनबाजी’ मान्यच नव्हती. आणीबाणीस त्यांचा पाठिंबा एका विशिष्ट कारणासाठी होता. देशाला शिस्त लागणार असेल तर काही काळ आणीबाणी हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले असल्याचे सामानाने म्हंटले आहे.
आता स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणे आणीबाणीतील दुसऱ्या स्वातंत्र्य लढय़ाचे सैनिक वेचून काढून हे सरकार आपल्या सग्यासोयऱ्यांना मासिक भत्ता देणार. हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्याच विरुद्ध आहे. ज्यांना हे पेन्शन दिले जाईल ती ‘घरे’ कोणाची हे सांगायला नकोच. जनतेचा पैसा लुटता येईल तेवढा लुटायचा हेच धोरण सध्या वासू-सपना सरकारने स्वीकारले असल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे.