मुंबई: राज्यातील कुपोषणासंदर्भात ‘शून्य मृत्यू’ हेच सरकारचे लक्ष्य हवे, हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले आहेत. मेळघाट कुपोषणप्रकरणी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने न्यायालयाने सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.
दरम्यान, काळजीवाहू सरकार सत्तास्थापनेच्या प्रपंचातच सध्या अडकून पडल्याचे चित्र आहे. त्यापुढे राज्यातील गंभीर प्रश्नांकडे लक्ष देण्याकडे भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे दुर्लक्ष होतेय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
याआधीही मेळघाट व अन्य दुर्गम भागांमधील कुपोषणाबाबत हायकोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. मात्र, मेळघाट कुपोषणाप्रकरणी प्रशासन आणि संबंधित अधिकारी हलगर्जीपणा करत असल्याचेच वेळोवेळी दिसून आले.