सातारा – महाविकास आघाडीत अनेक विषयांवर मतभेद आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी शिवसेना- भाजप युती पुन्हा सत्तेवर येऊ शकते, असे भाकित केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
रामदास आठवले कुटुंबीयांसोबत महाबळेश्वर येथे दोन दिवसांच्या विश्रांतीसाठी आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्यातील आघाडी सरकारबाबत ते म्हणाले, सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेबरोबर कॉग्रेस कधीच जाणार नाही, या भ्रमात भाजपचे नेते राहिल्यामुळे भाजपचे नुकसान झाले. शिवसेनेला दोन वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याची मी मागणी केली होती. परंतु, शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास केंद्रीय नेतृत्वही तयार नव्हते. या तीन पक्षांत अनेक विषयांवर मतभेद आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी शिवसेना- भाजप युती पुन्हा सत्तेवर येऊ शकते, असे भाकितही आठवले यांनी केले.
मोदी हे डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर करणारे आहेत. परंतु, मोदी संविधान बदलणार अशी वक्तवे करून कॉग्रेस मोदींची बदनामी करत असल्याचा आरोप आठवले यांनी केला.