मुंबई: शिवसेनेने पुन्हा एकदा सामनाच्या अग्रलेखातून भाजपला इशारा दिला आहे. नऊ हजार दुष्काळग्रस्त गावांना अद्याप शासकीय मदत मिळाली नसल्याची तक्रार आहे. याबाबत शिवसेनेने हि तक्रार तातडीने सोडवण्याचे अग्रलेखात म्हटले आहे.
महाराष्ट्र सध्या दुष्काळाच्या तीक्र झळा सहन करीत आहे. त्यात पाणी संकटाचे ढगदेखील गडद झाले आहेत. तरीही नऊ हजार दुष्काळग्रस्त गावांना अद्याप शासकीय मदत मिळाली नसल्याची तक्रार आहे. सरकारने या तक्रारीची तातडीने दखल घ्यायला हवी. सरकारी काम म्हटले की, त्याची गती कासवाचीच असणार हे आपल्याकडे गृहीतच धरले जाते, शिवसेनेने म्हटले आहे.
दुष्काळ जेवढा गंभीर तेवढीच ‘दुष्काळ दिरंगाई’देखील गंभीर ठरते. त्यामुळे रेंगाळलेल्या मान्सूनप्रमाणे या गावांतील शेतकऱ्यांची सरकारी मदत रेंगाळणार नाही याची काळजी सरकारने घ्यायला हवी. या गावांतील शेतकऱ्यांना शासकीय अर्थसहाय्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र अद्याप ते ‘लाल फिती’तच अडकून पडले आहे. सरकारने निदान आता तरी हे पेंड खात असलेले मदतीचे घोडे हलवावे आणि नऊ हजार गावांतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकारी मदतीचा प्रस्ताव मार्गी लावावा.