सोलापूर (प्रतिनिधी) – बळीराजा सध्या दुष्काळाचा सामना करत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या चारा छावण्यांचे राजकारण न करता दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन करतानाच शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी शिवसेना अग्रेसर असल्याचा विश्वास युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. पाऊस जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत छावणीवरील शेतकऱ्यांना महाप्रसाद देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रातील दुष्काळपिडीत चारा छावण्यांतील शेतकऱ्यांना शिवसेनेतर्फे बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद योजनेद्वारे अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. रविवारी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, सोलापूर दक्षिण व उत्तर सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा, माढा आणि पंढरपूर या तालुक्यातील एकूण 215 चारा छावण्यांमधील शेतकऱ्यांसाठी सोलापुरात झालेल्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांच्या हस्ते धान्य वितरण करण्यात आले. यावेळी आदित्य यांनी गंभीर दुष्काळप्रश्नी शिवसेना खंबीर असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी वाईट मार्ग न पत्करता शिवसेनेला हाक मारावी, असे आवाहन केले.