पेठ : सोशल मीडियावर गेले काही दिवस येणाऱ्या शिवजयंतीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. व्हाट्सअँपचा डिपी, स्टेटस तसेच फेसबुकवर मोठ्या प्रमाणात शिवजयंतीचा जोश आणि उत्साह वाढत आहे. स्वराज्याच्या राजांचा हा उत्सव मनामनात आणि घराघरांत दिसत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम, स्वराज्यासाठी त्यांची निष्ठा सर्वांनाच प्रेरित करते. म्हणूनच आजही महाराष्ट्राचा डंका सातासमुद्रापार वाजतो. फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख.
त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारीला सुटी जाहीर करते. शिवजयंती साजरी करण्यामागचा उद्देश शिवाजी महाराजांचे विचार, कार्य समाजातील प्रत्येकापर्यंत घटकापर्यंत पोहचवणे आहे.
शिवजयंतीचे जनक महात्मा फुले
इ.स. १८६९ साली महात्मा फुले यांनी रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. त्यांनी महाराजांच्या जीवनावर जगातील पहिला पोवाडा लिहिला. शिवाजी महाराजांचे कार्य घरांघरांत पोहचवण्यासाठी महात्मा फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली. ही पहिली शिवजयंती होती.
शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुण्यात झाला होता. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर सुरु झाली. त्यानंतर बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकजूट करण्याचे काम केले.