पुणे – छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या शिवजयंतीसाठी गृहविभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
यंदा करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित असल्याचे शासनाने म्हटले आहे. तसेच कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून फक्त 10 व्यक्तींचा उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यास शासनाने परवानगी दिली आहे.
दरवर्षी दि.19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नते. त्याइवजी सदर कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी, असे शासनाने म्हटले आहे.
शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम व रक्तदान शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे करोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी, असे आवाहनही शासनाकडून करण्यात आले आहे.