बारामती -करोनच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने गरजूंसाठी बारामती नगरपालिकेच्या हद्दीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत शिवभोजन थाळीची व्यवस्था केलेली आहे. थाळीची किंमत पाच रुपये ठेवण्यात आली आहे. मंगळवारी (दि. 31) पहिल्याच दिवशी 170 व्यक्तीने शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे.
शिवभोजन थाळीचा लाभ गरजूंनी घेण्याचे आवाहन प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे. शासनाची 150 थाळींची मर्यादा आहे; मात्र बारामतीत पहिल्याच दिवशी 170 गरजू व्यक्तींनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. बारामती शहरात देखील शिवभोजन थाळीची गरज असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
सरकारने 150 थाळींची मर्यादा वाढवणे गरजेचे आहे, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले. करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे.