केंद्रांमध्ये दुपारी 12 ते 2 या वेळेतच मिळणार जेवण
पिंपरी-चिंचवडमधील 4 केंद्रांमधून 500 व्यक्तींना जेवण
26 जानेवारीपासून “शिवभोजन’ केंद्रांना सुरुवात
पुणे – पुणे शहरातील 7 “शिवभोजन’ केंद्रांमधून 1 हजार नागरिकांना तर, पिंपरी-चिंचवडमधील 4 केंद्रांमधून 500 व्यक्तींना जेवण दिले जाणार आहे. येत्या 26 जानेवारीपासून “शिवभोजन’ ही योजना सुरू होणार आहे. शिवभोजन केंद्रामध्ये गर्दी झाल्यास नियंत्रणाकरिता आवश्यकतेप्रमाणे पोलीस संरक्षण पुरविण्यात येणार आहे.
राज्य शासनाने गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात “शिवभोजन’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागरिकांना अवघ्या 10 रुपयांत जेवण मिळणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने या दोन्ही शहरातील 11 केंद्रांची निवड केली आहे. या केंद्र चालकांना प्रशिक्षण दिले आहे. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर ही ठिकाणी निश्चित केली असून प्रामुख्याने शासकीय इमारती, बसस्थानक, रुग्णालये या ठिकाणांचा विचार करण्यात आला आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांना जेवणास मनाई
भोजनालयात बाहेरचे जेवण घेऊन येण्यास व भोजनालयातील जेवण बाहेर घेऊन जाण्यास मनाई आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच ज्या ठिकाणी ही योजना राबविण्यात येईल. त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा सवलतीच्या दरात जेवणास मनाई आहे. त्याचबरोबर अन्नाचा दर्जा योग्य असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी तपासणी होणार आहे. अन्न व औषध प्रशासनाने दिलेले प्रमाणपत्र दर्शनी भागावर लावणे बंधनकारक केले आहे. स्वच्छ पोषक पदार्थ वापरण्यात यावे, स्टेनलेस स्टीलची भांडी वापरावी, शिळे अन्नपदार्थ वापरू नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून केंद्र चालकांना देण्यात आल्या आहेत.
याठिकाणी असणार “शिवभोजन’ केंद्र
हडपसर गाडीतळ येथे शिवसमर्थ भोजनालय, कात्रज बसस्थानक येथे हॉटेल कात्रज कॉर्नर, स्वारगेट येथे बसस्थानक कॅन्टीन, मार्केटयार्ड येथे हॉटेल समाधान गाळा नंबर 11, शिवाजीनगर येथे कौटुंबिक न्यायालय कॅन्टीन, पुणे महापालिका येथे हॉटेल निशिगंधा, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कॅन्टीन, पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालय, वल्लभनगर बसस्थानक पिंपरी, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे कॅन्टीन.
दररोजच्या नोंदीसाठी “महाअन्नपूर्णा’ ऍप
एका लाभार्थ्याला एकावेळी एकदाच भोजन दिले जाणार आहे. दररोज नोंद घेण्यासाठी महाअन्नपूर्णा मोबाइल ऍप शासनाने विकसित केले असून त्यामध्ये लाभार्थ्यांचे नाव नोंदवून त्याचा फोटो अपलोड केला जाणार आहे. दररोज किती थाळ्यांचा खप झाला याची माहिती शासनास उपलब्ध होते.
अशी असणार थाळी
30 ग्रॅमच्या 2 चपात्या, 100 ग्रॅम एक वाटी भाजी, 100 ग्रॅम 1 वाटी वरण व 150 ग्रॅम भात या थाळीत समाविष्ट असणार आहे.