सोशल डिस्टन्ससाठी वेळ वाढवला : संचालक, आडतदरांच्या बैठकीत निर्णय
केंदूर (प्रतिनिधी) : पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार केंद्र लॉकडाऊनमुळे बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसानाला सामोरे जावे लागल्याने शेतकऱ्यांनी हे उपबाजार केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. दैनिक प्रभातने याबाबत वृत्त प्रसारित केल्यानंतर संचालक मंडळाने बैठक घेऊन उपबाजार केंद्र सोमवारपासून (दि. 8) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
आमदार अशोक पवार यांच्याशी चर्चा करून सभापती शशिकांत दसगुडे यांच्या सूचनेनुसार उपसभापती विश्वास ढमढेरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. यावेळी शासनाच्या करोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियमांचे पालन करून हे मार्केटयार्ड सुरु होणार आहे. यावेळी आडतदारांच्या समस्या संचालक मंडळाने जाणून घेतल्या त्याचबरोबर सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी मार्केटयार्डच्या वेळात बदल करण्यात आला आहे. दुपारी एक ते चार या वेळात तरकारीची विक्री होणार आहे तर सायंकाळी पाच ते आठ पर्यंत भाजीपाला विक्रीसाठी हे मार्केट खुले राहणार आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी यापुढे कच्चा कागदावर पट्टी लिहून न देता कायदेशीर पट्टी देण्याची सूचना संचालकांनी आडतदारांना केली. दरम्यान भाजीपाला आणि तरकारी विक्रीसाठी परिसरातील सर्वात विश्वसनीय मार्केटयार्ड अशी ओळख असल्याने शेतकऱ्यांनी हे मार्केटयार्ड सुरू करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन संचालक शंकर जांभळकर यांनी मार्केट यार्ड सुरू करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. यावेळी संपूर्ण मार्केटयार्डचा परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला अशाच प्रकारे रोज फवारणी करून परिसर निर्जंतुकीकरण करणार असल्याचे मार्केटयार्डचे विभागप्रमुख अनिल ढमढेरे यांनी सांगितले.
यावेळी संचालक विकास शिवले, प्रवीण चोरडिया, सुधीर गुंदेचा, सचिव अनिल ढोकले, अडतदार संघटनेचे अध्यक्ष गणेश गावडे, नरसिह ढोकले, धनंजय भुजबळ, निलेश धुमाळ आदी उपस्थित होते.