दोन्ही मतदारसंघातल्या प्रत्येकी 30 ‘व्हीव्हीपॅट’ची होणार पडताळणी
एका मशीनच्या पडताळणीसाठी लागणार किमान 45 मिनिटे
पिंपरी – यंदा कोणाचे सरकार हे चित्र 23 मे रोजी दुपारपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी अंतिम निकाल जाहीर होण्यास सायंकाळ होणार आहे. यावेळी पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट मशीनमधल्या स्लिप्सची ईव्हीएमच्या मतांसोबत पडताळणी होणार आहे. यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास उशीर होणार आहे. संपूर्ण राज्यात बहुचर्चित असणाऱ्या शिरूर व मावळ लोकसभा मतदारसंघात प्रत्येक सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक विधानसभेच्या पाच व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी होणार असल्याने दोन्ही लोकसभा मतदारसंघातील प्रत्येकी 30 व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी होणार आहे. ईव्हीएम मशीनवर मतमोजणी संपल्यानंतर ही पडताळणी करण्यात येणार आहे.
मावळ मतदारसंघातील 30 व शिरूर मतदारसंघातील 30 व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ईव्हीएम मशीनची मोजणी संपल्यानंतर ही पडताळणी करण्यात येणार आहे. त्यामुळे, निकाल स्पष्ट झालेला असला तरी निवडणूक विभागाला अधिकृत निकाल जाहीर करण्यासाठी वेळ लागणार आहे. एका मशीनची पडताळणी करण्यासाठी किमान पाऊण तासाचा वेळ लागणार आहे. त्यामुळे, चित्र स्पष्ठ झाल्यानंतर किमान पाच तासांनंतर अधिकृत निकाल हातात पडणार आहे.
निकालाची तारीख जशी-जशी जवळ येत आहे, तशी-तशी उत्सुकता शिगेला पोहोचत आहे. मात्र, बहुचर्चित असणाऱ्या या दोन्ही मतदारसंघाच्या अधिकृत निकालाला तांत्रिक कारणांमुळे अतिरिक्त वेळ लागणार आहे. दोन्ही मतदारसंघातील प्रत्येकी 30 “व्हीव्हीपॅट’ची पडताळणी केल्यानंतरच अधिकृत निकाल निवडणूक आयोगातर्फे जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे, अंतिम निकालासाठी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
संपूर्ण राज्यात या लोकसभा निवडणुकीत शिरूर आणि मावळ हे दोन मतदारसंघ चर्चेत राहिले आहेत. दोन्ही मतदारसंघात चुरशीची लढाई झाल्यामुळे दोन्ही पक्षांकडून विजयाचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे, निकालाची तारीख जवळ येत असतानाच कार्यकर्त्यांची उत्सुकताही शिगेला पोहचत आहे. या दोन्ही मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी येथे होणार आहे. निवडणूक विभागानेही मतमोजणीची जय्यत तयारी केली आहे. मात्र, पडताळणीमुळे अधिकृत निकाल हाती येण्यासाठी सर्वांनाच वाट पहावी लागणार आहे.