धुळे – एकाच कुटुंबातील तीन जणांनी तापी नदीच्या पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील गिधाडे येथे आत्महत्या केली आहे. हे तीनही सदस्य शहादा तालुक्यातील रहवासी आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गुरुवार रोजी गिधाडे येथील पुलावरून तापी नदीत उडी टाकणारी महिला व दोन पुरुषांना एका युवकाने पाहिले होते. त्याने माहिती दिल्यावरून शिरपूर शहर आणि शिंदखेडा पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना घटनास्थळी पुलावर कीटकनाशक, पाण्याची बाटली व चपला आढळल्या. व कावासाकी दुचाकीही उभी होती.
नथा बुधा वाघ, वय ५६, पत्नी सखूबाई, वय ५१, व गोपाल वय ३० घरातून बेपत्ता असल्याचे दिसून आले. पुलावरून उडी घेणाऱ्यांच्या वर्णनाशी त्यांचे वर्णन जुळल्याने या तिघांनी उडी टाकून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले.