सुस्त प्रशासनामुळे भाविकांना फटका
शिर्डी (प्रतिनिधी) – शिर्डीत साई भक्तांनी साईचा गजर साईनामाचा झेंडा रोविला, असा गजर करत साईंच्या चरणी माथा टेकविला. जवळपास लाखांच्या संख्येत भाविकांची शिर्डीत मांदियाळी पहावयास मिळाली. मात्र साई संस्थान, नगरपंचायत, सुरक्षा, वाहतूक या अशा सुस्त प्रशासनाचा फटका भाविकांना बसल, तरी शिर्डीत खूप दिवसांनंतर गर्दी पहावयास मिळाल्याने व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर समाधान पहावयास मिळाले.
गत वर्षात लोकसभा, विधानसभा निवडणुका, दुष्काळ, वर्ल्ड कपच्या मॅचेस, महाराष्ट्रभर पावसाने घेतलेले थैमान यामुळे भाविकांनी शिर्डीकडे पाठच फिरवली होती. त्यानंतर राज्यातील सत्तांतराचा फटका शिर्डीतील व्यावसायिकांवर झालेला दिसून आला. या दरम्यान शिर्डीत भाविकांची संख्या कमी झाली होती. मात्र अचानक वाढलेली गर्दी असो अथवा नसो. मात्र सुस्त प्रशासन गार झोपेत राहिलेले दिसून आले. रविवारी सायंकाळपर्यंत पाऊण लाखांच्या आसपास समाधी, मुखदर्शन, कळस दर्शन भाविकांनी घेतले.
साई संस्थानने नेहमीप्रमाणे सर्व गर्दी साई अतिथी गृहाजवळच केंद्रित केली. दोन नंबर गेटच्या पूर्व बाजूस मोफत दर्शन पास केंद्र नसल्याने सर्व भाविक हे अतिथी गृहाच्या मैदानात जमल्याने तेथे भाविकांची एकच झुंबड उडाली होती. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे भाविक व सुरक्षारक्षकांमध्ये हाणामाऱ्या झाल्या. त्यामुळे वेळेत दर्शन योजनेचा चांगलाच बोजवारा उडालेला दिसून आला. भक्तास देण्यात आलेल्या पासची वेळ 10 वाजेची देऊनसुध्दा भाविक 2 वाजेच्या सुमारास दर्शन करून बाहेर पडले. या दरम्यान काही संधीसाधूंनी गर्दीचा अंदाज पाहून भाविकांची पाकीटमारी केली. काही भाविकांनी तक्रार दिली नाही, तर काही भाविकांनी तक्रार देण्यासाठी पोलिस ठाणे शोधले, तर ते सापडले नाही. त्यामुळे पोलीस ठाण्याकडे कोणतेही नियोजन नसल्याचे दिसून आले. त्यामुळे भाविक कालही असुरक्षित असल्याचे पहायला मिळाले.
शिर्डी नियंत्रण शाखेचा अजबच नियम आहे. चोराला सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार पहायला. ज्या भागात मंदिर परिसराचे गेट क्र.1 येते, त्याच भागात संस्थानने गर्दी नेली. त्या भागातील वाहनांची गर्दी वाहतूक शाखेने सुरू ठेवली. त्या भागात वाहतूक नियंत्रण करताना दिसले. तर काही वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी नियंत्रण करण्याऐवजी दंडांच्या पावत्या करण्याचा धडाका लावला होता.
अशा अवस्थेत साईंचे दर्शन आनंदाने झाल्याचे चित्र न कळतपणे दाखवून आपण समाधानी असल्याचे भाविक भासवत होते. त्यातून आर्थिक संकटात सापडलेले व्यावसाईक मात्र थोड्या आशेने सुखावले होते. मात्र भाविक साईंच्या दर्शनाने सुखावले होते.