नागपूर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही दिवसांपूर्वी त्यांच्या दरे या गावी गेले होते. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कुटुंबासोबत लंडनला गेले आहेत. दरेवारी आणि लंडनवारीची सध्या तुलना केली जात आहे.
यावरून राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात त्यांच्याच गावाला गेले, तुमच्या नेत्यांसारखे सुटी घालवण्यासाठी लंडनला गेले नाहीत, असा टोला सामंत यांनी लगावला आहे.
विरोधकांनी शिंदेंच्या गावाला जाण्यावरून टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना सामंत म्हणाले, शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या नेहमीच टार्गेटवर असतात. त्यांनी काहीही चांगले केले तरी ठाकरे सेनेच्या लोकांना ते पचत नाही.
काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सोडवण्यासाठी ते पहलगामला धावून गेले त्यावरही टीका केली, त्यानंतर शेती पाहण्यासाठी आपल्या दरे गावात गेले तेही त्यांना रुचले नाही. शिंदे हे आपल्याच गावाला गेले, तुमच्या नेत्यांसारखे सुटी घालवण्यासाठी लंडनला गेले नाहीत.
दरे गाव महाराष्ट्रातच आहे. एकनाथ शिंदे यांची तिथे शेती आहे. ते यावेळी पहिल्यांदाच गेले नाहीत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत असतानाही ते जात होते. ते काही पिकनिकला लंडनला जात नाही. कोणी कुठे जायचे यावर आम्ही कधी बोलत नाही.
त्यांच्या घरातील सगळी मंडळी लंडनला गेली, तरीही आम्ही टीका करत नाही. हा आमच्या मनाचा मोठेपणा आहे. शिंदे यांच्यावर टीका केल्याने आमचे काही बिघडणार नाही. मात्र शिंदे यांच्यामुळे अनेकांचे अस्तित्व संपले, त्यामुळे ते सतत टीका करत असतात, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.