सातारा – कणाहीन माणूस ज्या वेळेला एखाद्या संविधानिक पदावर बसतो तेव्हा चांगल्या व्यवस्थेचे होत्याचे नव्हते होते. महाराष्ट्रामध्ये कोट्यवधी रुपयांच्या घोषणा करणारे शिंदे सरकार केवळ घोषणाबाजी करणारे सरकार आहे. प्रत्यक्षात खर्चाचे आकडे विचारल्यावर यांच्याकडे द्यायला उत्तरे नसतात, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आयोजित आढावा बैठकीनंतर ऍड. आंबेडकर म्हणाले, “”सध्या महाराष्ट्रामधील राजकीय असंतुष्टता न्यायालयाच्या दरवाजापर्यंत पोहोचली आहे. त्यावरून राजकीय अस्थिरता किती टोकाची आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो. या प्रकरणांमध्ये निवडणूक आयोगाच्या आयुक्तांचा अजिबातच वैधानिक दरारा नसल्याने कोणाचाही कसाही मनमानी कारभार सुरू आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केवळ कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या योजनांची घोषणा होत आहे. प्रत्यक्षात हे आकडे अस्तित्वात येणार आहेत की नाही हे तपासून पाहायला हवे. राज्यावरचे कर्ज किती, आस्थापना विभागावरचा खर्च किती, याच्यानंतर एखादा प्रकल्प राज्यात आला तर राज्यावर असणारे कर्ज, त्यावरील व्याज हे वगळून उरलेल्या निधीमधून विकास कामांवर प्रत्यक्षात खरोखर खर्च होणार आहे का याची उत्तरे आजपर्यंत मिळालेली नाहीत. त्यामुळे शिंदे सरकार हे केवळ घोषणाबाजी करणारे सरकार आहे.”
आम्हाला त्यांच्याकडून फारशा विकास कामांच्या अपेक्षा नाहीत, असे त्यांनी सांगितले. वेदांतचा गुजरातला गेलेला प्रकल्प, त्यावरून झालेला राजकीय वादंग, खोक्याचे राजकारण या बऱ्याचशा गोष्टी काहीच न बोलता बाहेर पडल्या. मात्र, प्रत्यक्षात वेदांतच्या संचालकांबरोबर राज्य सरकारने खरोखर चर्चा केली का या प्रकरणाची पुढे चौकशी झालीच नाही, म्हणजे महाराष्ट्रामध्ये विद्यमान सरकार आणि तत्कालीन सरकार यांनी फक्त प्रश्न मांडायचे, वस्तुस्थिती मात्र समजून न घेता राजकीय गुंता सोडवायचा नाही, असे धरसोडीचे धोरण ठेवले आहे, त्याचा व्यक्तिशः निषेध करतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेचे चिन्ह आणि बारा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने लवकर निर्णय द्यावा आणि येथील राजकीय अस्थिरता संपुष्टात आणावी, अशी मागणी त्यांनी केली. राज्यात नवनवीन प्रश्न निर्माण होत आहेत. मात्र, त्यावर केंद्रातील मोदी सरकार निर्णय घ्यायला तयार नाही.
सातारा पालिकेसाठी 26 उमेदवार तयार
साताऱ्यात ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला पूर्णपणे स्वायत्तता दिली आहे. स्थानिक पातळीवर राजकीय परिस्थिती बघून आघाडीचा निर्णय घेतला जाईल, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. सातारा नगरपालिका निवडणूक स्वबळावर आणि गरज पडल्यास युती करून लढू. त्याकरिता साताऱ्यात 26 उमेदवार तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आमने बंगल्याचे स्मारक तसेच प्रतापसिंह हायस्कूल शाळेला मिळावयाचा राष्ट्रीय दर्जा यासंदर्भातील प्रश्नावर “राजकीय पक्षांना याची गरज वाटली तर त्यांनी जरूर आंदोलन करावे,’ असे आंबेडकर यांनी सांगितले.