ठाणे – राज्यातील मंत्रिमंडळाचा ज्या दिवशी विस्तार होईल त्यादिवशी शिंदे-फडणवीस सरकार पडेल, याच भीतीने मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. एका मंत्र्याला चार-पाच जिल्हे पालकमंत्री म्हणून काम पाहावे लागत आहे. अशा प्रकारे कधी सरकार चालते का? हिंमत असेल तर निवडणुका घ्या, जसे कर्नाटकमधून जनेतेने भाजपला नाकारले. तसेच देशाच्या सर्वच राज्यात आगामी निवडणुकांमध्ये घडणार असल्याचा विश्वास कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
कॉंग्रेसच्या मानवाधिकार विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नाना पटोले म्हणाले, ठाणे जिल्हात आदिवासी भागात लोकांना रस्ता नाही, पिण्याचे पाणी नाही. दुसरीकडे शहरी भागात सोयीसुविधा नाहीत. मुंबईजवळील हे ठाणे जिल्ह्याची ही अवस्था आहे.
या शहरातील व जिल्ह्यातील अनेकांना मोठी सत्ता पद मिळाल्यावर देखील ते चांगले काम करू शकले नाहीत, असेच यातून स्पष्ट दिसून येते, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.
संसदीय मूल्य जोपासले पाहिजे हे राज्यकर्त्याना समजत नाही. राष्ट्रपती हे देशाचे, लोकसभेचे आणि राज्यसभेचे प्रमुख असतात. राष्ट्रपती पद हे संविधनिक सर्वात मोठे पद आहे. केबिनेट निर्णयाची मान्यता राष्ट्रपतीकडून घेतली जाते. देशात लोकशाही मजबूत करण्याचे काम संविधानने केले आहे. मात्र संविधानच संपविण्याचे काम होत असेल तर विरोध केला पाहिजे, असे पटोले यांनी म्हटले आहे.