आमदार अशोक पवार ः उड्डाणपूल उभारण्याची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
शिरूर (पुणे) – पुणे-शिरूर महामार्गावरील पुणे-शिक्रापूर दरम्यान वाहतूककोंडी सोडवण्याबाबत उड्डाणपूल तयार करण्याची मागणी शिरूर-हवेलीचे आमदार ऍड. अशोक पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे पुणे – शिक्रापूर मार्गावरील वाहतूककोंडी लवकरच फुटणार आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने बैठक बोलवण्याची मागणीही आमदार पवार यांनी केली आहे.
शिरूर-शिक्रापूर दरम्यान मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी व नियमित होणारे अपघात टाळण्यासाठी आमदार अशोक पवार यांनी पुढाकार घेतला आहे. या रस्त्यावरील उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी कमी होणार असून याचा दिलासा सर्वसामान्य नागरिक, प्रवासी, वाहतूकदार, कामगार, शेतकरी या सर्वांना होणार आहे. पुणे ते शिक्रापुर रस्त्यावरील महानगरपालिका हद्दीपर्यंत आठ पदरी रस्ता व त्यापुढे शिक्रापूर-मलठण पर्यंत चार पदरी रस्ता अस्तित्वात आहे.
शिक्रापूर हा विदर्भ मराठवाडा या विभागापासून पश्चिम महाराष्ट्र व मुंबई जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. तसेच पुणे-शिक्रापूर शिरूर या रस्त्यालगत सणसवाडी, रांजणगाव गणपती येथे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झाले आहे. त्यामुळे पुणे-शिक्रापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूककोंडी, अपघात होणे नित्याचे झाले आहे. यावर उपाय म्हणून पुणे महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने पुणे ते शिक्रापूर दरम्यान पुणे महानगरपालिका हद्दीतील संपूर्ण लांबी करिता उड्डाण पुलाचा प्रस्ताव तयार केला आहे. त्याची अंदाजीत किंमत 2 हजार 900 कोटी इतकी अपेक्षित आहे.
महामार्ग रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित करा – पुणे ते शिक्रापूर महामार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरित करावा. त्यामधून कार, जीप बसेस, वगळून इतर व्यावसायिक अवजड वाहनांना पथकर लावण्यात यावा, यामुळे शासनाला निधी उपलब्ध होण्यास मदत होईल. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या धरतीवर पुणे ते शिरूर रस्त्यावरील पुढील दहा वर्षांचा पथकर वसुली अधिकारी उद्योजक देऊन त्या माध्यमातून निधी उभारणी करून महामार्ग सुधारण्याचे उड्डाणपुलाचे काम हाती घ्यावे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.