नॉटिंगहॅम – सतारीची मैफल रंगत असतानाच तार तुटावी आणि मैफिलीचा बेरंग व्हावा असेच भारताचा सलामीवीर शिखर धवन याच्याबाबत घडले आहे. हुकमी सलामीवीर म्हणून त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. सुरुवातीच्या अपयशानंतर त्याला सूर सापड्ला नाही तोच त्याच्या डाव्या हातास फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न झाले असून आणखी किमान दोन सामने त्याचा सहभाग अनिश्चित झाला आहे.
ऑस्ट्रेलियाविरूध्द झालेल्या सामन्यात त्याने तडाखेबाज शतक टोलविले होते.त्याने 109 चेंडूत 117 धावा केल्या होत्या. त्यामुळेच भारताला 50 षटकांमध्ये साडेतीनशे धावांचा पल्ला ओलांडता आला होता. याच सामन्यात नॅथन कोल्टिअर नील याचा उसळता चेंडू त्याच्या डाव्या हाताच्या अंगठयावर जोरात बसला. त्यामुळे त्याला संपूर्ण वेळ क्षेत्ररक्षण करता आले नव्हते. त्याच्या जागी रवींद्र जडेजा याने क्षेत्ररक्षणाची जबाबदारी सांभाळली होती.
संघाचे फिजिओ पॅट्रिक फऱ्हार्ट यांनी धवनच्या दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला आणखी दोन सामने खेळता येणार नाही असा सल्ला दिला आहे. त्यामुळे धवन हा न्यूझीलंड व पाकिस्तानविरूध्दच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. धवन हा सध्या लीड्स येथे दुखापतीवर उपचार घेत असून पॅट्रिक हेदेखील त्याच्या समवेत आहेत. धवन हा सहा दिवस खेळू शकणार नाही. भारताचा 22 जून रोजी अफगाणिस्तानशी सामना होणार आहे. या लढतीमध्ये धवनची गरज भासणार नाही. मात्र 27 जून रोजी भारताची वेस्ट इंडिजशी लढत होणार आहे. या लढतीचे वेळी त्याची किंवा त्याच्यासारख्याच आक्रमक सलामीविराची आवश्यकता आहे असे भारतीय संघव्यवस्थापनाचे मत आहे.
धवन याच्या जागी बदली खेळाडूला मायदेशातून पाचारण करण्याबाबत अद्याप संघव्यवस्थापनाने निर्णय घेतलेला नाही. पॅट्रिक यांच्याकडून धवनच्या दुखापतीचा अहवाल आल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल. बदली खेळाडूला पाचारण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) त्यासाठी परवानगी घ्यावी लागेल.
धवनच्या अनुपस्थितीतही भारतीय संघ बांगलादेश (2 जुलै) व श्रीलंका (6 जुलै) यांच्यावर मात करू शकेल आणि भारतीय संघास उपांत्य फेरी गाठण्यास अडचण येणार नाही असा विश्वास भारतीय संघाच्या व्यवस्थापनास वाटत आहे. साखळी सामने होईपर्यंत धवनला भरपूर विश्रांती द्यावी असेही त्यांचे मत आहे. धवनच्या जागी सलामीस के.एल. राहुल याला संधी दिली जाईल. राहुल हादेखील सलामीचाच फलंदाज आहे. तसेच अंतिम अकरा खेळाडूंमध्ये विजय शंकर, दिनेश कार्तिक व रवींद्र जडेजा यांच्यापैकी एका खेळाडूचा समावेश केला जाईल.
भारतीय नियामक मंडळाने संघातील राखीव खेळाडू म्हणून ऋषभ पंत व अंबाती रायुडु यांची नावे आयसीसीकडे दिली आहेत. अर्थात बदली खेळाडू कुणाला संधी द्यावी याबाबत आयसीसीने स्पर्धा तांत्रिक समितीला सर्वाधिकार दिले आहेत. राखीव खेळाडूंच्या यादीत नाव नसलेला मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यर याचेही नाव चर्चेत आहे.