शेवगाव (प्रतिनिधी) : शेवगाव शहरासाठी २९ ऑगष्ट २०१६ ला नाबार्ड अंतर्गत अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि पथदर्शी असा चार कोटी ६६ लाख ४६ हजार ५६८रु खर्चाच्या ग्रामीण सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची निविदा पास झाली. अंबेजोगाईचे एम. एम .होळंबे या ठेकेदाराने १५ टक्के कमी दराने ती मिळविली. या प्रकल्पाच्या बांधकामासाठी एक वर्ष तर दैनंदिन देखभाल दुरुस्तीसाठी २ वर्षाची मुदत होती; म्हणजे १ सप्टेबर २०१९ मध्ये हा पथदर्शी प्रकल्प पूर्ण व्हायला हवा होता . मात्र नगर परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे काम सुरु होऊन साडेपाच वर्षे लोटली तरी प्रकल्प रेंगाळला असल्याची खंत शेवगावकरांना आहे.
या काळात ग्रामपंचायतीची नगर परिषद झाली होती. विनासायास आलेल्या या मोठया प्रकल्पाची पूर्ती करुन नगर परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याची संधी मात्र नगर परिषदेला साधता आली नाही. पाहिल्यांदाच नगरसेवक झालेले बहूतेक नगरसेवक फक्त गटारीच्या व रस्त्याच्या कामाच्या ठेकेदारीत व आपसातील भांडणात मशगुल राहिले. त्यांच्या कार्यकाळात एकाही नगरसेवकाने या प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेऊन त्यात येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या नाहीत. तसेच प्रकल्प मुदतीत पूर्ण करण्याचे दृष्टीने प्रयत्न देखील केले नाहीत. हा प्रकल्प सुरू होईल तेव्हा त्याचे श्रेय घेण्यास मात्र हेच नगरसेवक सरसावतील.
येथील समाजभान असलेल्या रुपाली रविंद्र शेळके यांनी शहराच्या भल्यासाठी शेवगाव शहरालगतच दादेगाव रस्त्यावरील कोटयावधी रुपये किंमतीची ३० गुंठे जागा नाममात्र अटीवर प्रकल्पासाठी बक्षिस पत्र करुन दिली आहे .मात्र प्रकल्प उभारणीतील दिरंगाईमुळे तसेच प्रकल्पास लागणाऱ दिरंगाईमुळे तसेच प्रकल्पास लागणाऱ्या वाळू ,सिमेंट, .वीटा, खडी, गज,सेंट्रींगचे साहित्य नेण्या आणण्यासाठीची वाहने शेळके यांच्या शेजारच्या जमिनीचा वापर करत असल्याने या काळात त्यांची जमिन नापेर राहिली आहे. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे .
पर्यावरणाचे संतुलन व्हावे, संपूर्ण गावाच्या सांडपाण्याचे शुद्धीकरण होऊन ते शेतीसाठी उपयोगात यावे, शहर स्वच्छ व सुंदर व्हावे या दृष्टिकोनातून शहरातील सांडपाण्याचे व्यवस्थापन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने करण्याचा सुमारे पाच कोटी रुपये खर्चाच्या बहुउद्देशीय पथदर्शी प्रकल्पास राज्य सरकारने २०१६ साली मंजुरी दिली. राज्यात या वर्षात सुरू करण्यात आलेल्या दहा पथदर्शी प्रकल्पामध्ये जिल्ह्यातील फक्त शेवगावचा समावेश होता .
ग्रामीण भागातील १५ हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या १४ गावात सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबवण्याचे नियोजन होते . नाबार्डच्या सहकार्याने एक अब्ज ११ लाख पंधरा हजार रूपये खर्चाच्या या प्रकल्पास सरकारने ग्रामीण पायाभूत विकास निधी सतरा अंतर्गत प्रशासकीय मान्यता दिली होती.
शेवगावाच्या ६८ हजार लोकसंख्येच्या सांडपाण्याचे व्यवस्थापन गृहीत धरून प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून या प्रकल्पासाठी जर्मन तंत्रज्ञान वापरण्यात आले. जमिनीखाली साडे तेरा हजार घनमीटर क्षमतेचे ३ प्रचंड मोठे हौद करण्यात आलेअसून त्यातून पाणी टप्याटप्याने अधिक शुध्द होणार आहे . या हौदात पाण्यातील अनाआवश्यक घटकांचे शोषण करणाऱ्या जल वनस्पती लावल्या जाणार आहेत .प्रकल्पात संपूर्ण गावातील सांडपाणी एकत्र करून ते अत्याधुनिक गाळणी यंत्रणेच्या सहाय्याने शुद्ध केले जाणार आहे. त्यातून शुध्द होणारे कोट्यावधी लिटर पाणी शेती व वृक्ष संवर्धनासाठी वापरात येणार आहे .
ते परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी वितरित करून ग्रामपंचायतीला दरमहा निश्चित उत्पन्न मिळणार आहे. या शिवाय सांडपाण्याचा वापर करून घेण्यात येणाऱ्या भाजीपाला आदि पिका मुळे होणारे आजार टळणार आहेत. प्रकल्य परिसरात सुंदर बगीच्याचे व वृक्षारोपणाचे नियोजन आहे.