कोल्हापूर, (प्रतिनिधी) – शेतकरीविरोधी तीन शेती कायदे रद्द करावेत. वीज विधेयक मागे घ्यावे आणि शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक 50 टक्के इतक्या रकमेचा हमीभाव देणारा कायदा करावा, या मागण्यांसाठी 27 सप्टेंबर रोजी संयुक्त शेतकरी कामगार मोर्चातर्फे बंद पुकारण्यात आलेला आहे.
याबाबतचा निर्णय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात निमंत्रक संपत बापू पवार पाटील व कॉम्रेड नामदेव गावडे यांच्या वतीने बोलविण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत भारत बंदला पाठिंबा म्हणून त्या दिवशी शहरात मोटार सायकल रॅली काढून सर्व व्यापारी व व्यावसायिकांना कोल्हापूर बंद करण्याविषयी आवाहन करण्यात आले आहे.