नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने-सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या हिंसाचाराला जबाबदार मोदी सरकार असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून होत असल्याचे दिसून येत आहे. याच मुद्यावरून आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.
काय आहे सामनाचा अग्रलेख
दिल्लीच्या रस्त्यावर जी दंडुकेशाही झाली त्याची जबाबदारी फक्त शेतकरी आंदोलकांवर टाकून चालणार नाही. जे सरकारला हवे होते तेच घडवून आणण्यात आले. त्यात बळी गेले ते शेतकऱ्यांचे आणि रक्त सांडले ते पोलीस व जवानांचे. कायदा हाती घेणाऱ्यांची गय कोणत्याच सरकारने करू नये, पण साठ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर लढणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवून वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही? तीन कृषी कायदे म्हणजे देशाचे वर्तमान आणि भविष्य नाही. कुणाचे तरी हित त्यात गुंतले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांवर दमनचक्र सुरू आहे! हे देशहिताचे नाही.
प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत जे घडविण्यात आले, त्याचे समर्थन कोणीच करणार नाही. सिंघू बॉर्डरवर साठ दिवसांपासून हजारो शेतकरी आंदोलन करीत आहेत. 26 जानेवारीस ‘ट्रक्टर परेड’ करू, सर्व काही शांततेत होईल असे किसान नेते सांगत होते. पण पोलिसांनी उभारलेले सर्व सुरक्षा कठडे तोडून आंदोलकांचे ट्रक्टर्स दिल्लीच्या हद्दीत घुसले व थेट लाल किल्ल्यापर्यंत पोहोचले. सकाळी दिल्लीच्या राजपथावर प्रजासत्ताक दिनाची ‘परेड’ झाली व दुपारी शेतकऱ्यांच्या ‘परेड’ने संपूर्ण देश हादरून गेला. दिल्लीत अचानक गोंधळ व हलकल्लोळ माजला. कायदा आणि सुव्यवस्थेची अक्षरशः लक्तरे निघाली. प्रजासत्ताक दिनी हे असे काही घडावे याची वेदना सगळ्यांनाच आहे. आता आंदोलक शेतकऱ्यांवर भारतीय जनता पक्षाचे लोक तुटून पडले आहेत.
दिल्लीत घुसून गोंधळ घालण्याचा कार्यक्रम पूर्वनियोजित होता व शेतकऱ्यांचे आंदोलन हे दहशतवाद्यांच्या हाती गेल्याचा शोध भाजप गुप्तचर यंत्रणेने लावला आहे. आता प्रश्न इतकाच आहे की, लाल किल्ल्यावर घुसून ज्या झुंडीने हडकंप माजवला, त्या झुंडीचे नेतृत्व कुणीएक दीप सिद्धू करीत होता. हा सिद्धू पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या आतल्या गोटातला माणूस असल्याचे समोर आले आहे. भाजपचे पंजाबमधील खासदार सनी देओल यांच्याशी सिद्धूचे घनिष्ठ संबंध आहेत. हे महाशय गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या गर्दीत घुसून बंडाची, चिथावणीची भाषा करीत होते, असे राजेश टिकैत वगैरे शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे. शेतकऱयांचे आंदोलन साठ दिवसांपासून शांततेत सुरू आहे. देशातील
शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात असलेले तीन कृषी कायदे रद्द करा ही मागणी घेऊन शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसून आहेत. तरीही शेतकरी आंदोलनात फूट पडली नाही आणि शेतकऱ्यांचा संयमही सुटला नाही. त्यामुळे केंद्र सरकारला हात चोळत बसावे लागले.