नागठाणे – स्मशानभूमीअभावी शेरेवाडी येथील ग्रामस्थांनी गावातील मृत व्यक्तीवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंत्यविधी करण्याचा पवित्रा घेतला. याची काणकुण लागताच तहसीलदार व पोलिस अधिकाऱ्यांनी धावपळ करत यशस्वी शिष्टाई केली.
शेरेवाडी येथील स्मशानभूमीचा प्रश्न गेली अनेक दिवस प्रलंबित आहे. शासनाने स्मशानभूमीसाठी निधीही उपलब्ध केला आहे. मात्र जागेअभावी स्मशानाभूमी उभी राहू शकली नव्हती. त्या दृष्टीने ग्रामस्थांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अशात आज गावातील अशोक शंकर लोहार यांचे निधन झाले. पावसामुळे त्यांचा अंत्यविधी कोठे करायचा हा प्रश्न उभा राहिला.
ग्रामस्थांनी अंत्यविधी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्याचा पवित्रा घेतला. बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी यांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी लगेचच तहसीलदार आशा होळकर यांना या घटनेची माहिती दिली. तोपर्यत ग्रामस्थ मृतदेहासह खिंडवाडी येथे पोहोचले होते. तहसीलदार तसेच पोलिस अधिकाऱ्यांनी तिथेच सर्वांशी चर्चा केली. तसेच जागेचा प्रश्न शासकीय पातळीवर निकालात काढला जाईल, असेही आश्वासन दिले. अधिकाऱ्यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर अखेर संगम माहुली येथे अंत्यविधी करण्यात आला.