चंद्रकांत जाधव यांची माहिती; कुळकजाई बैठकीत उमेदवारीबाबत शंका नसल्याचे स्पष्ट
गोंदवले – माण खटाव मतदारसंघातून विधानसभेसाठी शिवसेनेच्या वतीने शेखर गोरे यांची उमेदवारी अंतिम असून याबद्दल कोणतीही शंका आणि तडजोड नाही, हा “मातोश्री’वरुन आलेला आदेश आहे, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी कुळकजाई येथील बैठकीत स्पष्ट केले.
कुळकजाई (ता. माण) येथील आर्यन फार्म हाऊसमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला चंद्रकांत जाधव यांच्यासह शिवसेना नेते व विद्यमान उमेदवार शेखर गोरे, माजी उपजिल्हाप्रमुख विजय पाटील, सुरेखाताई पाखले, खटाव तालुका प्रमुख युवराज पाटील, माण तालुका प्रमुख बाळासाहेब मुलाणी, उपप्रमुख संतोष किवटे, रामभाऊ जगदाळे, वडूज उपतालुका प्रमुख बाळासाहेब जाधव, विकास काळे, वडूज शहर प्रमुख सुशांत पार्लेकर, सचिन माने, संतोष दुबळे, कालिदास पवार, अजित जाधव, किशोर गोडसे, अंबादास नरळे, म्हसवड शहरप्रमुख राहुल मंगरुळे, राजेंद्र कट्टे, अमित कुलकर्णी उपस्थित होते. चंद्रकांत जाधव म्हणाले, “”मातोश्रीवरून निघणारा आदेश अंतिम असतो. असाच आदेश उध्दव ठाकरे यांनी काढला तो शेखर गोरे यांच्या शिवसेना प्रवेशाचा. गोरे यांचे सामाजिक काम चांगल्या स्वरूपाचे असून ते स्वखर्चाने काम करत आहेत लोकांचे प्रश्न सोडवत आहेत अशा माणसाची आवश्यकता असल्याचे सांगून ठाकरे यांनी तुमच्या एका जागेसाठी महाराष्ट्रातील युती तोडण्याची वेळ आली तरी चालेल पण माण खटावमधून शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरेच असतील असा शब्द दिला होता.”
श्री. शेखर गोरे म्हणाले, “मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांचे प्रेम माझ्यावर आहे. माझ्या प्रेमाखातर हे सगळे माझ्यासोबत असतात. जनतेच्या साथीने मी सत्ताधीश विरोधी आमदाराला टक्कर देत प्रस्थापितांच्या विरोधात लढा देऊन राष्ट्रवादीत असताना जिल्हा परिषदचे तीन गट, माण पंचायत समिती, माण तालुक्यातील खरेदी विक्री संघ, सोसायट्या, ग्रामपंचायत लढवून त्या विरोधकांकडून राष्ट्रवादीकडे सत्ता आणली. मात्र, तरीही राष्ट्रवादीने आमच्यावर मोठा अन्याय केला. तेव्हा मात्र मग कार्यकर्ते गप्प बसेनात. मग राष्ट्रवादीला रामराम केला व पुन्हा कार्यकत्यांच्या सोबत बैठक घेतली.
माझा निर्णय झाला नव्हता तेव्हा मला चंद्रकांत जाधव यांचा फोन आला. ते म्हणाले, भाऊ, मला मातोश्रीवरून आदेश आहे. तुमच्यासारख्या माणसाची गरज आहे पक्षाला. तुम्ही आमच्या शिवसेना पक्षात या. मग माण खटावमध्ये शिवसेनेचा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही येणार असेल तर आम्ही पुढाकार घेऊन मतदारसंघ शिवसेना पक्षाला मागून घेणार. मग मी सगळ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला.” आता मी जुन्या सगळ्यां शिवसैनिकांना सोबत घेऊन पुढे वाटचाल करणार आहे, जुन्या शिवसैनिकांवर कधीही अन्याय करणार नाही, असे श्री. गोरे यांनी सांगितले. विरोधकांनी एवढ्या दिवस नुसतं “करून दाखवले’ असे डिजिटल बोर्ड फक्त लावले, एवढी हरितक्रांती झाली तर अजून माणमध्ये 81 टॅंकरने पाणी पुरवठा कसा काय केला जातोय, अशी टीका त्यांनी केली.