लखनौ – भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज शेफाली वर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात वेगवान अर्धशतक फटकावले. तिच्या खेळीच्या जोरावर भारताच्या महिला संघाने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना 9 गडी राखून जिंकत प्रतिष्ठाही जपली. पहिले दोन्ही सामने जिंकत दक्षिण आफ्रिकेने ही मालिका यापूर्वीच जिंकली आहे.
तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत दक्षिण आफ्रिकेला 7 बाद 112 धावांवर रोखले. भारताकडून राजेश्वरी गायकवाडने केवळ 9 धावांच्या मोबदल्यात 3 बळी घेतले. तर, अनुराधा रेड्डी, राधा यादव, दीप्ती शर्मा व सिमरन बहादूर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने शेफाली व कर्णधार स्मृती मानधनाच्या खेळीच्या जोरावर केवळ 11 षटकांत 1 गडी गमावून 114 धावा करत विजय मिळवला. शेफालीने केवळ 26 चेंडूत अर्धशतक फटकावले. भारताकडून टी-20 क्रिकेटमधील हे तिसऱ्या क्रमांकाचे वेगवान अर्धशतक ठरले आहे.
शेफालीने आपल्या खेळात 30 चेंडूत 7 चौकार व 5 षटकारांसह 60 धावा केल्या. ती बाद झाल्यावर मानधनाने 28 चेंडूत नाबाद 48 धावांची खेळी करताना हरलीन देओलच्या साथीत संघाचा विजय साकार केला. राजेश्वरी गायकवाड सामन्याची तर, शेफाली मालिकेची मानकरी ठरली.
संक्षिप्त धावफलक –
दक्षिण आफ्रिका – 20 षटकांत 7 बाद 112 धावा. (सून लुस 28, लॉरा गुडॉल 25, राजेश्वरी गायकवाड 3-9) भारत – 11 षटकांत 1 बाद 114 धावा. (शेफाली वर्मा 60, स्मृती मानधना नाबाद 48, हरलीन देओल नाबाद 4, नानदुमीसो संगासे 1-18).