मुंबई: मुंबईचा पाऊस नुकताच शांत झाला मात्र या पावसाने अनेकांचे घर उध्वस्त केले. अंगावर शहारा आणणारा हा पाऊस होता. गेल्या 46 वर्षांपासून असा पाऊस झाला नसल्याचे वृत्त देखील झळकले होते. प्रत्येक जण मुसळधार पावसात स्वतःला वाचवत होता. मात्र या थरकाप उडवणाऱ्या पावसात एक माउली अशी होती ज्याप्रकारे बाजीप्रभू देशपांडेंनी खिंड लढवली. तसेच या माउलीने 7 तास लढत मुंबईकरांचे प्राण वाचवले.
या माउलींचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक महिला रस्त्यावरील मॅनहोलजवळ उभी राहून गाड्यांना रस्ता दाखवत आहे. जेणेकरून कोणताही अपघात होऊ नये. या महिलेने इतरांसाठी दाखवलेल्या शौर्याचे सगळीकडे कौतुक होत आहे. मुंबईचा पावसात या महिलेचे स्वतःचे घर, मुलींच्या शिक्षणासाठी जमवलेले 10 हजार रुपये सुद्धा वाहून गेले.
कांता मारुती कालन, असे त्या महिलेचं नाव आहे. माटुंगा रेल्वे स्थानकाजवळच्या तुलसी पाईप रोडवर फुटपाथवर त्या राहतात. कांता यांना एकूण 8 मुलं असून त्यापैकी 6 मुलांची लग्न झाले आहेत. कांता रस्त्यावर फुले विकून आपल्या कुटुंबाचा उदर्निवाह करतात. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे त्यांनी मॅनहोलचं झाकण उघडून पाण्याला वाट करून दिली. आणि चक्क 7 तास मॅनहोलजवळ उभं राहून या महिलेने मुंबईकरांना वाचवल, असे वृत्त मुंबई मिरर’ने दिले आहे.
कांता मारुती कालन सांगतात, दुसर्या दिवशी बीएमसीचे अधिकारी आले आणि त्यांनी मला मॅनहोल का उघडला असे विचारले. पण मी काय केले असते? मला पर्याय नव्हता. पूर्णपाणी वेगाने वाहत होते, आणि कोणीही मदतीसाठी पुढे येत नव्हते.