राजगुरूनगर (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील राजगुरूनगर, चाकण आणि आळंदीसह 18 गावांमध्ये दूध, औषधे, रुग्णालये सोडली तर 100 टक्के कडक लॉकडाऊन असणार आहेत. तर तालुक्यातील उर्वरीत सर्वच गावांतील आस्थापना दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवल्यानंतर दुपारनंतर मात्र कडक निर्बंध ठेवले जाणार आहेत. दुपारनंतर गावातील नागरिक बाहेर पडणार नाहीत, अशा सूचना स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाला दिल्या आहेत. अशी माहिती उपविभागीय तथा प्रांताधिकारी संजय तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खेड तालुक्यात लॉकडाऊन कशा स्वरूपाचे असावे यासाठी प्रांताधिकारी संजय तेली यांनी सोमवारी (दि. 13) अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी तहसीलदार सुचित्रा आमले, गटविकास अधिकरी अजय जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, चांडोली ग्रामीण आरोग्य केंद्राचे डॉ. दीपक मुंढे आदी अधिकारी उपस्थित होते.
20 खासगी रुग्णवाहिका उपलब्ध
करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता महाळुंगे येथील कोविड सेंटरवर ताण येऊ नये म्हणून चांडोली ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. अस्वस्थ करोनाबाधित रुग्णांसाठी पुणे येथे उपचारासाठी न्यावे लागू नये म्हणून तालुक्यातच अत्याधुनिक सोयी-सुविधांसह हॉस्पिटल सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तालुक्यात सुमारे 20 खसगी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिली.
ही गावे पूर्णपणे बंद
खेड तालुक्यातील राजगुरूनगर, चाकण व आळंदी नगरपरिषदेच्या हद्दी आणि करोना रुग्णसंख्या वाढलेल्या चाकण औद्योगिक परिसरातील मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, कडाचीवाडी, खराबवाडी, येलवाडी, निघोजे, चिबंळी, मोई, मरकळ, सोळू, शेलपिंपळगाव, तर ग्रामीण भागातील कडूस, पाईट, दावडी, वाकी खुर्द, पिंपरी बुद्रुक आणि राजगुरूनगर शहरालगत सातकरस्थळ या 18 गावांमध्ये 10 दिवसांसाचा कंटेन्मेंट झोन (प्रतिबंध क्षेत्र) जाहीर करण्यात आले आहे. तेथे 100 टक्के लॉकडाऊन करण्यात येणार आहे.
औद्योगिक वसाहतीतील कंपन्या सुरू
लॉकडाऊन काळात चाकण औद्योगिक क्षेत्रातील कोणत्याही कंपन्या बंद होणार नाहीत. कंटेन्मेंट झोनमधील किंवा लॉकडाऊन कालावधीत कामगारांना तहसीलदार कार्यालयातून सुरू झालेल्या कक्षातून पास देण्यात येणार आहेत. तालुक्यातील तीन नगरपरिषदा आणि 18 गावे यामधील कंपनी कामगारांना पास असेल तरच ये-जा करण्याची सवलत दिली आहे.
…त्यानंतर “तो’ निर्णय घेऊ
पाच दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर शेतीविषयक दुकाने-औषधे, खते सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. नागरिकांनी सयंम ठेऊन नियमांचे उल्लघंन न करता करोनाची साखळी रोखण्यासाठी सहकार्य कराव, असे आवाहन तहसीलदार सुचित्रा आमले, गटविकास अधिकारी अजय जोशी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी केले आहे.
पास काढण्यासाठी गर्दीच गर्दी
आंबेठाण -चाकण नगरपरिषद हद्द आणि औद्योगिक वसाहतीतील काही गावांमध्ये लॉकडाऊन आहे. मात्र, कंपन्या सुरू राहणार असल्याने या कंपनीमध्ये काम करणाऱ्यांना ये-जा करण्यासाठी पास काढण्याचे आदेश देण्यात अले आहेत. त्यामुळे महाळुंगे इंगळे पोलीस चौकीत पास काढण्यासाठी कामगारांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती