मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे च्या फेसबुक पोस्टने राज्यात मागच्या दोन दिवसापासून धुमाकूळ घातला आहे. तिच्या कृत्याच्या सत्ताधारी आणि विरोधकांकडून आक्षेप घेत निषेध नोंदवला जात आहे. मात्र,या सर्वात रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केतकीच्या फेसबुक पोस्टचं समर्थन केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सदाभाऊ खोत यांनी या प्रकरणात अभिनेत्रीला पाठिंबा देत, “केतकी चितळेचा मला अभिमान असल्याचे म्हटले आहे. तसेच “केतकी कणखर आहे तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही, तिला मानावे लागेल. मला तिचा अभिमान आहे. न्यायालयात तिने स्वतःची बाजू स्वतः मांडली, असं सांगतानाच तुम्ही केलं तर पाटलांच्या पोराने केलं आणि इतरांनी केलं तर कुणब्याच्या पोरानं केलं. आता हे धंदे बंद करा. आमचा लढा हा प्रस्थापितांविरोधात आहे,” असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.
याच प्रकरणाचा संदर्भ देत “सरकार पुरस्कृत आतंकवाद राज्यात वाढवता का? देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करताना तुमची नैतिकता कुठे गेली होती? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील चंद्रकांत पाटील यांच्यावर वेगळा शब्द वापरत टीका केली होती. त्यावेळी नैतिकता कुठे होती? अमोल मिटकरी ब्राम्हण समाजाला टार्गेट करतात, त्यावेळी तुमच्या जिभेला हाड नव्हते का? स्वतःवर टीका केली की सगळे आठवते, अशी टीकाही त्यांनी केली.
प्रस्थापितांनी नेहमीच विस्थापितांवर अन्याय केला आहे. आम्हाला हा प्रस्थापितांच्या वाडा पाडायचा आहे. म्हणून आमचा लढा वाडा विरुद्ध गावरान आहे, असंही त्यांनी सांगितलं. त्यांनी केलं म्हणून आम्ही करणार नाही. समोरून दगड येत असेल आणि ज्याच्या अंगावर दगड पडला तर त्याने काय गुहेत लपायचं का?, असा सवालही त्यांनी केला.
जहांगीरदारांनी गुन्हा केला तर त्याला माफ आणि इतरांनी काही केलं तर गुन्हा आहे. तिला मानावे लागेल. तिने कोर्टात स्वत:ची बाजू मांडली. तिच्या पोस्ट नंतर तुमच्या कार्यकर्त्यांच्या टीका टिप्पणी बघा. तुम्ही केलं तर पाटलांच्या पोरानं केलं आणि इतरांनी केलं तर कुणब्याच्या पोरानं केलं हे धंदे बंद करा, असा इशाराही त्यांनी दिला.