यंदाचा मैत्रेयीदिन नुकताच (गेल्या रविवारी) पार पडला. मैत्रेयीदिन म्हणजे महिलांचा सन्मान, त्यांना औक्षण, त्यांना निर्भयतेची, मदत करण्याची खात्री पुरुषानं देणं. लग्नानंतर पहिल्या पाडव्याला पत्नीला मी ओवाळलं तेव्हाचे तिच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे, विस्मयाचे, कौतुकाचे व आदराचे भाव मी कधीच विसरू शकत नाही. सुमारे 8-9 वर्षांपूर्वी मी आणि माझे रोटरी क्लबमधील मित्र डॉ. राजेंद्र भवाळकर यांनी हा उपक्रम सुरू केला. त्यावेळी नुकतंच दिल्लीत निर्भया प्रकरण घडलं होतं. तेही माझ्या मनात खदखदत होतं.
आम्ही महिलांचा आदर करतो आणि सगळ्याच पुरुषांकडे तुम्ही “त्या’ दूषित नजरेनं पाहू नका असं काहीसं माझ्या डोक्यात होतं. पहिल्या वर्षी केवळ ब्राह्मणच नव्हे तर मराठा, ओबीसी आणि अगदी एक मुस्लिम महिलाही त्यात सहभागी झाली होती. मुळात मुस्लिम धर्मात महिला कुंकू लावत नाहीत पण या कार्यक्रमात त्या महिलेनं औक्षण करून घेतलं.
दोन-तीन वर्षांनंतर येणाऱ्या पुरुषांना मी असं सांगायला सुरुवात केली की नुसतं ओवाळल्यावर थांबू नका. घरातही आईला, पत्नीला मदत करत जा.
अगदी स्वयंपाक करणं नाही तर झाडणं, पुसणं, भाजी निवडणं हजारो छोटी छोटी कामं असतात. हे मी स्वतः अगोदर केलं व नंतरच इतरांना सांगितलं. यावर्षी झालेल्या कार्यक्रमाला तर एका सहाय्यक पोलीस आयुक्तांसह दोन-तीन सामाजिक ट्रस्टचे पुरुष व महिला मोठ्या संख्येने आले होते. त्या आलेल्या पुरुषांत बांधकाम व्यावसायिक, नोकरदार, निवृत्त बंक अधिकारी, अभिनय क्षेत्रातील लोक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते अशांचा समावेश होता.
सहा. पोलीस आयुक्त म्हणाले, “समाजात सगळेच काम करतात. त्याचं त्या त्यावेळी कौतुक होतं, पुरस्कार मिळतात. पण पोलीस आणि गृहिणी हे दुर्लक्षित आहेत. ते “थॅंकलेस जॉब’ आहे. खरं तर प्रत्येकानं गृहिणीचं ऋणी असणं आवश्यक आहे.’
आता हा उपक्रम पुण्यातल्या अनेक घरात गेला आहे. एकाच दिवशी, एकाचवेळी निदान काही शे घरात तरी हा उपक्रम सुरू असतो.
माझी एक साहित्यिक मैत्रिण हा उपक्रम समजल्यावर म्हणाली, “महिलांचा सन्मान करणे ही चांगलीच गोष्ट आहे. पण काही काळानंतर यालाही कर्मकांडाचं रूप प्राप्त होईल.’ “आता हजारो वर्षांनंतर पाडव्याला आणि भाऊबिजेलाही कर्मकांडाचंच रूप नाही का आलेलं? पत्नी पतीला ओवाळते आणि बहीण भावाला ओवाळते पण त्या ओवाळणीत पती किंवा भाऊ त्यांना काहीतरी भेट देतो. आता तर “भेट’ घेण्यासाठीच काहीजणी उत्सुक असतात. त्यातला गोडवा, आपलेपणा जबाबदारीची जाणीवही उरली आहे कुठे?
कदाचित तसंही होईल किंवा होईलच. पण पुरुषप्रधान संस्कृतीत अगोदर ही प्रथा तरी पडू दे. हजारो वर्षांपूर्वी आपल्याकडे आणि जगभरही मातृसत्ताक पद्धतीच होती. आता काळाचं चक्र काही उलटं फिरवता येणार नाही, ते होऊ नये. पण खरी समानता असायला काय हरकत आहे? आणि पुरुषानं घरातली थोडी कामं करण्यासाठी जर पुरुषी अहंकार मध्ये येत असेल तर त्याला उत्तर म्हणूनच पुरुष असूनही आम्ही हे सुरू केलं आहे. याची प्रथा आणि कर्मकांड व्हायचं तेव्हा होईल. काळाच्या ओघात आम्ही त्यावेळी नसू पण आज वेगळा वाटणारा हा उपक्रम पुण्यातच नाही तर महाराष्ट्रात आणि भारतातही पोचलेला असेल याची आम्हाला खात्री आहे. अनेक अंधाऱ्या वाटांचं रूपांतर प्रकाश वाटेत होतं, करावं लागतं मग ही तर साधी पायवाट आहे. त्याचा राजरस्ता होईलच.
– सहजानंद