नवी दिल्ली – पुर्वाश्रमीचे भाजपचे खासदार आणि आता कॉंग्रेस मध्ये असलेले शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणाचे कौतुक केले आहे. मोदींचे भाषण विचारप्रवर्तक होते असे त्यांनी म्हटले आहे.
देशाला भेडसावणाऱ्या प्रश्नांची मोदींनी या भाषणात व्यवस्थीत मांडणी केली आहे. त्यांचे भाषण अभ्यासपुर्ण होते. आपण खऱ्याला खरे म्हणण्यासाठी प्रसिद्ध किंवा कुप्रसिद्ध आहोत त्यामुळे आपण हे मत प्रांजळपणे व्यक्त करीत आहोत असा अविर्भावही त्यांनी आणला आहे.
या आधी मोदींच्या भाषणातील काही मुद्द्यांचे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी स्वागत केले होते. त्या पाठोपाठ आता शत्रुघ्न सिन्हा यांनीही या भाषणाबद्दल ट्विटरवरून विधायक प्रतिक्रीया दिल्याने त्याची वेगळी चर्चा सुरू झाली आहे.