अपक्ष गटनेते कैलास बारणे यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली मागणी
पिंपरी – गोरगरिबांना घरे मिळावीत म्हणून सुमारे 45 वर्षापूर्वी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थपना झाली. परंतु, वाढती कामगारांची संख्या, बिल्डर्स लोकांनी वाढवलेल्या घरांच्या किंमती त्यामुळे आपल्या कुवतीप्रमाणे नागरिकांनी हक्काची घरे बांधली आहेत. त्या विकास क्षेत्रात अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या अटी शिथील करुन ही बांधकामे अल्प दरात नियमित करावीत, तसेच संपूर्ण शास्तीकर माफ करावा, अशी मागणी अपक्ष आघाडीचे गटनेते केैलास बारणे यांनी केली आहे.
शहरातील शास्ती कर, प्राधिकरणातील बाधकामांचा प्रश्न हे प्रश्न नागरिकांच्या जीवनाशी निगडीत आहेत. भविष्यात मुबलक पाणी उपलब्ध नाही झाल्यास नागरिकांना भीषण परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन या प्रश्नांवर त्यांच्याशी चर्चा केली.
यावेळी त्यांनी हे प्रश्न सोडविण्यासाठीचे निवेदनही पवार यांना दिले. शास्ती कराची टांगती तलवार कायम असल्यामुळे नागरिक आपल्या हक्काच्या घरात मानसिक दडपणाखाली राहत आहेत. म्हणून, संपूर्ण शास्तीकर माफ करावा. ज्यांनी कर्जबाजारी होवून शास्तीकर भरला आहे, अशांना ती रक्कम परत द्यावी, अशीही मागणी बारणे यांनी केली.
“पवना’ प्रकल्प पुन्हा सुरु करा
सर्वाधिक चर्चेत असलेल्या पवना जलवाहिनी प्रकल्प पुन्हा सुरु करण्यात यावा, अशीही मागणी बारणे यांनी केली. उल्लेखनीय बाब अशी की हा प्रकल्प वादाचा एक मोठा मुद्दा झाला होता. सध्या या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जलवाहिन्या देखील शहरात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशा परिस्थितीत हा प्रकल्प पुन्हा सुरु करण्याची मागणी करण्यात येत आहे. वाढत्या शहराला मुबलक पाणी पुरवण्याची गरज लक्षात घेता पवना योजनेचे काम पुन्हा सुरु करण्याची मागणीही बारणे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केली आहे.