मुंबई : केंद्र सरकारकडून आज कंपनी करात सवलती देण्याचा जो निर्णय जाहीर झाला आहे त्याचे आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीही स्वागत केले आहे. सरकारचा हा निर्णय धाडसी असून त्यामुळे अर्थव्यवस्थेत विधायक वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. आज येथे या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. त्यातून अर्थकारणाला चालनाच मिळेल.
उद्योग क्षेत्राला लागू करण्यात आलेले कर अधिकच होते. ते कमी करणे गरजेचेच होते. सरकारने योग्य वेळी हा निर्णय घेतल्याने भारतातील कंपन्यांचे कर आता जगातील थायलंड, फिलिपाईन्स अशा विकसनशील देशांच्या बरोबरीने आले आहेत. रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनीही हा निर्णय अर्थव्यवस्थेला देण्यात आलेला एक नवा बुस्टर असल्याचे म्हटले आहे.