चेन्नई – अद्रमुकमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नेत्या व्ही.के. शशिकला यांनी आज अद्रमुकबरोबर समझोता करण्याचे सूतोवाच केले. तामीळनाडूमध्ये एप्रिल महिन्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर शशिकला यांनी केलेले समझोत्याचे आवाहन सूचक आहे. तामीळनाडूमध्ये होत असलेल्या निवडणूकीत विजय मिळवण्यासाठी अद्रमुकच्या सर्वेसर्वा दिवंगत जयललिता यांच्या सच्च्या पाठीराख्यांनी एकत्र यावे, असे आवाहन शशिकला यांनी केले.
बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी चार वर्षांची शिक्षा भोगून परतलेल्या शशिकला यांनी राजकारणात सक्रिय होण्याचेही संकेत दिले आहेत. जयललिता यांच्या 73 व्या जन्मदिनी त्यांच्या स्मृतिस्थळावर पुष्पांजली अर्पण करून शशिकला यांनी “अद्रमुक अनेक शतके नागरिकांची सेवा करत राहिल.’या जयललिता यांच्याच शब्दांची आठवण करून दिली. विधानसभेतील विजयासाठी जयललितांच्या पाठीराख्यांनी एकत्र यावे, असे सांगताना शशिकला यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. आपल्या आवाहनाला जयललितांच्या पाठिराख्यांकडून योग्य प्रतिसाद मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
शशिकला यांनी केवळ ऐक्याचे आवाहन केले आहे. मात्र हे आवाहन अद्रमुकला आहे की अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघमला आहे, हे त्यांनाच विचारावे, असे शशिकला यांचे पुतणे दिनकरन म्हणाले.