पाकच्या बासित अलीने केला आरोप
लाहोर – टी-20 विश्वकरंडकाबाबतचा निर्णय घ्यायला मुद्दाम उशीर केला गेला. तसेच अनेक बैठका घेतल्यावरही आयपीएलसाठी विंडो मिळू नये यासाठी प्रयत्न केले गेले. यासाठी आयसीसीचे स्वतंत्र अध्यक्ष शशांक मनोहर हेच सर्वतोपरी जबाबदार होते, असा आरोप पाकिस्तानचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बासित अली याने केला आहे.
टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार होती. ही स्पर्धा आता रद्द झाली असली तरी हा निर्णय घ्यायला मनोहर यांनीच वेळ लावला. आयसीसीच्या वारंवार बैठका होऊनही त्यांनी केवळ आयपीएलचे आयोजन अडचणीत यावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले. जेव्हा सपर्धेतील सर्व 16 संघांचे विलगीकरण तसेच अन्य सर्व सुविधा पुरवणे शक्य नाही असे ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने सांगितले तेव्हा मात्र मनोहर स्वतः वादात सापडतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर मात्र, लगेचच विश्वकरंडक रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला, असेही बासित अली म्हणाला.
मनोहर जेव्हा बीसीसीआयचे अध्यक्ष होते तेव्हापासूनच त्यांच्या नियुक्तीबाबत अनेक सदस्य नाराज होते. त्यांची मुदत संपल्यावर ते आयसीसीच्या पदावर नियुक्त झाले.