मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वादाने चांगलाच वातावरण तापले आहे. या प्रकरणावर राज्यातील राजकारण्यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. त्यात आता या मुद्द्यावर आता राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्या नवी मुंबईत माध्यमांशी संवाद साधत होत्या.
शर्मिला ठाकरे नवी मुंबईत क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी सामन्याच्या आयोजकांचे कौतूक केले. तसेच मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी त्यांना उर्फी जावेद प्रकरणावर तुमचे महिला म्हणून काय मत आहे? असा प्रश्न केला. या प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर देत शर्मिला ठाकरे यांनी, “मी पूर्ण कपड्यांत फिरते. बाकीच्यांचे मला माहीत नाही,” असे म्हणाल्या.
दुसरीकडे चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदसंदर्भातील भूमिकेवर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे. “माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे. तरिही मी त्याला घाबरत नाही. मी माझ्या मुद्द्यावर ठाम आहे. मला लोक विचारत आहेत की, चित्रा वाघ उठली की उर्फीवर बोलत राहते. पण मी उर्फीवर उठसूठ बोलत नाही. मला प्रश्न विचारले जात आहेत, म्हणून मी उत्तरं देते. सार्वनजिक ठिकाणी नंगटपणा नको, हा एकच मुद्दा मी मांडला आहे. या राज्यात एका आईचा आवाज चित्रा वाघने उचलला असेल तर त्यात वावगं काय?” असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.
दरम्यान, चित्रा वाघ यांच्याकडून कडाडून विरोध होत असला तरी उर्फी जावेदवर मात्र कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. उर्फी जावेद अजूनही तोकड्या कपड्यांवरील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसते. काही दिवसांपूर्वी तर ट्वीटच्या माध्यमातून उर्फीने चित्रा वाघ यांना थेट लक्ष्य केले होते.