मुंबई -लोकसभा निवडणुकांनंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतृत्वाखालील स्थिर सरकार निर्माण होण्याची शक्यता काही गुंतवणूकदारांना वाटत आहे. त्यामुळे जागतिक परिस्थिती खराब असतानाही भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी तुफान खरेदी होऊन निर्देशांक मोठ्या प्रमाणात उसळले.
आजच्या तेजीचे नेतृत्व बॅंकिंग आणि वाहन क्षेत्रातील कंपन्यांनी केले. बाजार बंद होताना मुंबई शहर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 537 अंकांनी म्हणजे 1.44 टक्क्यांनी वाढून 37,930 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 150 अंकांनी वाढून 11407 अंकांवर बंद झाला.
सरलेल्या आठवड्यात अस्थिर वातावरणातही सेन्सेक्स 467 अंकांनी तर निफ्टी 128 अंकांनी वाढला आहे. शुक्रवारी बजाज फायनान्स या कंपनीचा शेअर सहा टक्क्यांनी वाढला. कंपनीच्या चौथ्या तिमाहीतील नफ्यात 50 टक्के वाढ झाल्यामुळे कालपासून या कंपनीचा शेअर एकतर्फी वाढत आहे. वाहन, ग्राहक वस्तू, वित्त, बॅंकिंग आणि भांडवली वस्तू क्षेत्राचे निर्देशांक 2. 45 टक्क्यांपर्यंत वाढले.
मात्र आरोग्य, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्राचे निर्देशांक एक टक्क्यापर्यंत कमी झाले. मुख्य निर्देशांकाबरोबरच मुंबई शेअर बाजाराचा मिडकॅप आणि स्मॉलकॅप बऱ्याच प्रमाणात वाढल्याचे दिसून आले.
आज रुपयाच्या मूल्यात घट झाली. त्याच बरोबर क्रुड तेलाचे भाव 72.5 डॉलर प्रति पिंपापर्यंत वाढले. मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष करून भारतातील गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. रविवारी एक्झिट पोल जाहीर होणार आहेत. त्याचा काही प्रमाणात सकारात्मक अंदाज आल्याचे वाटून गुंतवणूकदारांनी खरेदी केली असल्याचे बोलले
जात आहे.
“जागतिक परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. जागतिक शेअर बाजारातील वातावरणही संमिश्र होते. मात्र निवडणुकांनंतर रालोआचे स्थिर सरकार येईल असे बऱ्याच गुंतवणूकदारांना वाटू लागले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचे दिसून आले.
-जगन्नाधम थुंगगुंटला, उपाध्यक्ष सेंट्रम ब्रोकिंग