मुंबई, दि.1- भारती एअरटेलचा महसूल या तिमाहीमध्ये वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मंगळवारी या कंपनीच्या शेअरच्या भावात 11 टक्के वाढ झाली. शेअर बाजारांमध्ये सकाळी निर्देशांकात बरीच वाढ झाली होती. मात्र ती पातळी निर्देशांकांना कायम राखता आली नाही.
बाजार बंद होताना मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 167 अंकांनी वाढून 30,196 अंकांवर बंद झाला. सकाळी हा निर्देशाक 700 अंकापर्यंत वाढला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 55 अंकांनी वाढून 8876 अंकांवर बंद झाला.
केंद्र सरकारने विविध उद्योगासाठी बऱ्याच योजना जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये भांडवल सुलभता हा मुख्य मुद्दा आहेत. त्यामुळे बॅंका आणि बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांना केंद्र सरकारच्या हमीवर कमकुवत झालेल्या उद्योगांना कर्ज पुरवठा करावा लागणार असल्यामुळे कालपासून बॅंका आणि बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांच्या शेअरवर परिणाम होत आहे. बॅंकींग क्षेत्राबरोबरच भांडवली वस्तू, उर्जा, रिऍल्टी या क्षेत्राचेनिर्देशांकही कमी झाल्याचे दिसून आले. दूरसंचार, तंत्रज्ञान, उर्जा, वानह क्षेत्राच्या निर्देशांकात थोडीफार वाढ होऊ शकली.
अमेरिकेतील एका कंपनीने माणसावर लसीचा यशस्वी प्रयोग केल्यामूळे जागतिक शेअर बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण होते.