मुंबई – सरलेल्या आठवड्यात काही कंपन्यांनी चौथ्या तिमाहीचे चांगले ताळेबंद जाहीर केले आहेत. दरम्यानच्या काळामध्ये भारतातील करेना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आशावादी झालेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी जोरदार खरेदी केल्यामुळे शेअर निर्देशांक उसळले.
बॅंकांच्या शेअरची गुंतवणूकदारानी जास्त खरेदी केल्याचे दिसून आले. बाजार बंद होताना राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 1.67 टक्क्यांनी म्हणजे 245 अंकांनी वाढून 14,923 अंकांवर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 848 अंकांनी वाढून 49,580 अंकांवर बंद झाला.
इंडसइंड बॅंक, स्टेट बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी बॅंक, ऍक्सिस बॅंक, बजाज फिन्सर्व, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्याचे शेअर सोमवारी उसळले. मात्र भारती एअरटेल, नेस्ले, सन फार्मा, पावर ग्रिड या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
रुपयाचा भाव वाढला
सोमवारी रुपयाचा दर 7 पैशांनी वाढून 73.22 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला. त्यामुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात खरेदी केली असल्याचे दिसून आले. पंधरा दिवसापासून रुपया घसरत होता. मात्र आता रुपयाचा दर स्थिर होत असल्याचे वातावरण आहे. मात्र परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार विक्री करीत असल्याचे वातावरण आहे. शुक्रवारी या गुंतवणूकदारांनी 2,607 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.
रिलायन्स सिक्युरिटीज संस्थेचे विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले की, बऱ्याच कंपन्यांनी गेल्या आठवड्यात चांगले ताळेबंद जाहीर केले आहेत. त्याचबरोबर करोना रुग्नांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भारतीय गुंतवणूकदारांना आगामी काळ उत्साहवर्धक वाटत असल्याचे दिसून येत आहे.
करोना रुग्नांची कमी होत असलेली संख्या पाहता जूनच्या मध्यापर्यंत वातावरण पूर्णपणे निवळून जाईल. त्यामुळे करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव फक्त पहिल्या तिमाहीत मर्यादित राहील असे गुंतवणूकदारांना वाटत आहे.
जागतिक बाजारातूनही सोमवारी सकारात्मक संदेश आल्यामुळे गुंतवणूकदारांचा धीर वाढला आणि जोरदार खरेदी झाली असल्याचे दिसून आले. जागतीक पातळीवरील सकारात्मक वातावरणामुळे क्रुडच्या दरामध्ये आज एक टक्क्यांची वाढ झाली असल्याचे दिसून आले.