नवी दिल्ली – शेअर बाजारात तांत्रिक बिघाड होऊन गुंतवणूकदारांच्या व्यवहारावर परिणाम होतो. अशा वेळी गुंतवणूकदारांना काही प्रमाणात तरी नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या शक्यतेवर बाजार नियंत्रक सेबी विचार करीत आहे.
तांत्रिक बिघाडामुळे अनेक वेळा शेअर बाजाराच्या कामकाजावर परिणाम होतो. हा परिणाम वेग- वेगळ्या प्रकारचा असतो. यासाठी गुंतवणूकदारांच्या नुकसानीचे मुल्यांकन करण्याची यंत्रणा विकसित केली जाणार आहे. सेबीच्या वार्षिक अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
भारतातील शेअर बाजारानी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे गुंतवणूकदारांना देशाच्या कानाकोपऱ्यातून शेअर बाजारांमध्ये गुंतवणूक करता येऊ लागली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा पाया विस्तारित होत आहे.
या चांगल्या बाबी आहेत. मात्र अनेक वेळा शेअर बाजाराच्या कामकाजात अडथळा येतो. अशा वेळी गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ नये. त्याच बरोबर शेअर बाजार आणि इतर घटकांनी आपल्या तांत्रिक बाबी निर्दोष ठेवाव्यात यासाठी सेबी प्रयत्न करीत असल्याचे अहवालात म्हटले आहे.