मुंबई – हवामान विभागाने या वर्षी पाऊस चांगला पडणार असल्याचे भाकीत केले आहे. त्याचबरोबर काही कंपन्यांनी चांगल्या नफ्याचे ताळेबंद जाहीर केले आहेत. यामुळे आशावादी झालेल्या गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी सुरू केली आहे. परिणामी मंगळवारी भारतीय शेअरबाजाराचे निर्देशांक विक्रमी पातळीवर बंद झाले.
गेल्या चार दिवसापासून शेअर निर्देशांक एकतर्फी वाढता आहेत. मंगळवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 369 अंकांनी म्हणजे 0.95 टक्क्यांनी वाढून 39,275 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक 96 वाढून 11,787 अंकांवर बंद झाला. गेल्या चार सत्रात सेन्सेक्स 690 अंकांनी वाढला आहे.
मंगळवारी बॅंका, ग्राहक वस्तू आणि दूरसंचार कंपन्यांच्या शेअरकडे गुंतवणूकदारांचा ओढा होता. त्यांनी आज मिडकॅप आणि स्मॉलकॅप मधील कंपन्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. टीसीएस कंपनीच्या शेअरच्या भावात मंगळवारीही सहा टक्क्यांनी वाढ झाली. परदेशी गुंतवणूकदार भारताबाबत कमालीचे आशावादी झाले आहेत. काल त्यानी 1038 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.
“जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळ्यात चांगला पाऊस पडणार असल्यामुळे ग्रामीण भागातील क्रयशक्ती वाढणार आहे. त्याचबरोबर कंपन्या चांगले ताळेबंद जाहीर करू लागल्या आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी खरेदीचे धोरण चालू ठेवले आहे.
-विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजी सेवा