मुंबई – इतर देशांच्या तुलनेत 2021 मध्ये भारतीय शेअर बाजारांनी उत्तम परतावा दिला आहे. विशेष म्हणजे मोठ्या कंपन्यापेक्षा छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या किमतीमध्ये या वर्षांत जास्त वाढ झाली असल्याचे आढळून आले आहे.
28 डिसेंबरपर्यंत संकलित केलेल्या आकडेवारीनुसार मुंबई शेअर बाजाराचा मिड कॅप 37 टक्क्यांनी म्हणजे 6,712 अंकांनी वाढला आहे. तर स्मॉल कॅप 56 टक्क्यांनी म्हणजे 10,824 अंकांनी वाढला आहे. याच काळामध सेन्सेक्स 21 टक्क्यांनी म्हणजे 10,146 अंकांनी वाढला आहे. 2018 पासून मार्च 2020 पर्यंत स्मॉल कॅप आणि मिड कॅपसाठी वाईट काळ होता. त्या काळात दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर लावण्यात आला होता.
म्युच्युअल फंडासंदर्भातील अनेक नियम बदलले होते. त्यानंतर मात्र गुंतवणूकदारांनी व म्युच्युअल फंडांनी स्मॉल कॅप व मिड कॅपमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यामुळे सरलेले वर्ष स्मॉल कॅप व मिड कॅपसाठी अतिशय उमेदीचे राहिले.
दरम्यानच्या काळामध्ये छोट्या कंपन्या वाढाव्यात व तगून राहाव्यात यासाठी केंद्र सरकारने बऱ्याच उपाययोजना केल्या आहेत. करोनाच्या काळात सरकारने मोठ्या कंपन्यांना मदत केली नाही. मात्र छोट्या कंपन्यांच्या कर्जाच्या फेररचनेसाठी मदत केली. त्यांना कर्ज उपलब्ध करण्यासाठी ग्यॅरंटी दिली.
त्यामुळे आगामी काळात या छोट्या कंपन्या वाढाव्यात याकरिता सरकार सकारात्मक राहण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटते. त्यामुळे आगामी काळातही मिडकॅप आणि स्मॉल कॅप मोठ्या निर्देशांकांपेक्षा जास्त परतावा देण्याची शक्यता विश्लेषकांना वाटते.
गेल्या वर्षी रिझर्व बॅंकांनी भांडवल सुलभता निर्माण केल्यामुळे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली होती. 2017 मध्ये मुख्य निर्देशांकांपेक्षा छोटे निर्देशांक कमी वेगाने वाढले होते.
त्यामुळे छोट्या कंपन्यांच्या शेअरचे भाव जास्त आकर्षक वाटत आहे तसे पायपर सेरिका या कंपनीचे संस्थापक अभय अग्रवाल यांनी सांगितले. त्याचबरोबर मोठ्या कंपन्यांमध्ये साधारणपणे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात.
मात्र सरलेल्या वर्षाच्या अखेरच्या टप्प्यांमध्ये परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मोठ्या कंपन्यांच्या शेअरची बरीच विक्री केल्यामुळे हे निर्देशांक काही प्रमाणात कमी झाले होते. मात्र त्याचा परिणाम छोट्या कंपन्यांच्या शेअरवर झाला नाही