नवी दिल्ली: शारदा चीट फंड घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कोलकाता शहराचे माजी पोलिस आयुक्त राजीवकुमार यांना देण्यात आलेले अटकेपासूनचे संरक्षण मागे घेतले आहे. या प्रकरणात कायद्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी अशी सुचनाही न्यायालयाने सीबीआयला दिली आहे.
शारदा चीट फंड घोटाळ्यातील आरोपींना कोलकाता पोलिसांनी संरक्षण दिले आणि त्यांनीच या प्रकरणातील पुरावे नष्ट केले असा सीबीआयचा दावा आहे. तथापी सीबीआयने मोदी विरूद्ध ममता यांच्या राजकारणातून पोलिस आयुक्तांच्या विरोधात खोटे आरोप केले आहेत असा दावा राजीवकुमार यांच्यावतीने करण्यात आला होता. पश्चिम बंगाल सरकारही त्यांच्या पाठिशी उभे राहीले होते त्यामुळे सीबीआयचे पथक कोलकात्यात येऊनही त्यांची चौकशी करू शकले नव्हते. कोर्टाने या संबंधात गेल्या 5 फेब्रुवारी रोजी कुमार यांच्या अटकेला संरक्षण दिले होते.