राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा, माजी केंद्रीय कृषिमंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शरद पवारसाहेब यांचा आज (गुरुवार) वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू मांडणारा लेख…
माझी सुरुवातीची पोस्टिंग कुर्डुवाडी, पंढरपूर आणि त्यानंतर 1989 मध्ये बारामती प्रांताधिकारी म्हणून झाली. 1989 ते 1993 अशा साडेचार वर्षांच्या कालावधीत मी बारामतीत होतो. मतदारसंघ आणि मूळ गाव असल्याने बैठका आणि कामाच्या निमित्ताने शरद पवारसाहेबांना नेहमी भेटण्याचा आणि बोलण्याचा योग यायचा. बैठकीत एखादा मुद्दा मांडताना शांतपणे ऐकून घेणे, इतर कोणी मध्ये बोललं तर कटाक्षाने त्याला थांबवणं, मग ती व्यक्ती कितीही मोठी असली तरी विषयाचं गांभीर्य समजावून सांगून बैठक पुढे नेताना मी त्यांना पाहिलंय.
पाण्याचा प्रश्न, प्रामुख्याने दुष्काळ व कोरडवाहू भागाला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ते नेहमी आग्रही असायचे. दुष्काळी भागातील परिस्थिती जाणून घेतल्यानंतर कधी कधी ते अस्वस्थदेखील होत. त्यावेळी एक व्यक्ती म्हणून त्यांची संवेदनशीलता पाहायला मिळायची. लोकांप्रती असलेली त्यांची तळमळ पाहायला मिळाली.
1993 मध्ये कौटुंबिक कारणास्तव मुंबईला येण्याचं फारसं मनात नसतानाही अनेक लोकांच्या आग्रहास्तव मी साहेबांचा स्वीय सचिव म्हणून रुजू झालो. साहेबांसोबतचा हा कालावधी खूप अनुभवसमृद्ध करणारा होता.
स्वीय सचिव म्हणून साहेबांसोबतचा पहिला दौरा ठरला. करमाळ्याला हा पहिला दौरा ठरला होता. हा प्रवास हेलिकॉप्टरने झाला. हेलिकॉप्टरमध्ये साहेबांसमवेत प्रथमच बसलो. साहेबांचा मला पहिला प्रश्न होता, ‘कोण कोण असतं घरामध्ये? मुलं किती आहेत तुम्हाला? घर मिळालं का मुंबईत? घर किती मोठं आहे? मुलांना शाळेत प्रवेश मिळाला का?’ मी एक सचिवस्तरीय अधिकारी, पण मुख्यमंत्र्यांनी आपल्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तीबाबत व्यक्त केलेली ही काळजी व विचारपूस पाहून मी अचंबित झालो. या आणि अशा अनेक प्रसंगांमधून साहेबांच्या मोठ्या व्यक्तिमत्वाची जाणीव मला झाली.
करमाळ्याकडे जात असताना हेलिकॉप्टरमधून दिसणारे डोंगर, धरणं, नद्या, गावं यांची माहिती साहेब मला सांगत होते आणि मी आश्चर्यानं पाहत, ऐकत होतो. साहेबांना भेटण्यासाठी लोकांची नेहमीच गर्दी असायची. त्यातून बैठकीच्या व लोकांना दिलेल्या भेटीच्या वेळा ते कसोशीनं पाळायचे. याचा नेहमी अचंबा वाटायचा. एका बैठकीनंतरचा प्रसंग अजूनही चांगला स्मरणात आहे. एक महत्त्वाची बैठक बराच वेळ सुरू होती आणि बैठक संपवून आम्ही बाहर पडलो.
बाहेर खासदार, आमदार, कार्यकर्ते व नागरिकांनी साहेबांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. बाहेर आल्यानंतर व्हरांड्यातून जाताना हळूहळू गर्दी वाढायला लागली. कार्यकर्ते, नागरिकांनी निवेदन देण्यास सुरुवात केली. साहेब ते स्वीकारायचे आणि माझ्याकडे द्यायचे. त्या गर्दीतून वाट काढत एक वयस्कर महिला साहेबांकडे आली आणि म्हणाली, मुंबईच्या दंगलीत माझा तरुण मुलगा मृत्यूमुखी पडलाय, मला मदत हवी आहे. एवढ्या गर्दीत तिचं निवेदन माझ्याकडे देताना साहेब मला म्हणाले, हे निवेदन बाजूला काढून ठेवा आणि गाडीत बसलो की मला द्या.
साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गाडीत बसल्यानंतर ते निवेदन मागून घेतलं आणि पूर्ण वाचलं. मला म्हणाले, “या महिलेला आपल्याला मदत करायची आहे. मुख्यमंत्री निधॅतून या महिलेला मदतीचा आदेश काढा. अडचणीतल्या त्या असाह्य महिलेची परिस्थिती साहेबांनी तेवढ्या लोकांमधून नेमकी ओळखली कशी आणि त्या महिलेसंबंधी साहेबांच्या मनातली भावना, मतळमळ मला भावनिक करुन गेली. कोणत्याही विषयावर साहेबांकडून काही मत वा सूचना हव्या असतील तर आधी चिठ्ठी पाठवायची. त्यावर साहेब स्पष्ट सूचना द्यायचे. दौऱ्यावर जायचं असेल तर हेलिकॉप्टरमध्ये कोण लोक येतील? मोटारीनं कोण जातील? ते केव्हा आणि कुठे पोहोचतील? बरोबरच्या लोकांची निवास, भोजनाची सोय कोठे करावी, याच्या स्पष्ट सूचना ते द्यायचे.
मुख्यमंत्री वा इतर कोणत्याही पदावर असले तरी प्रवास करताना मुख्यमंत्र्यांचा ताफा येतो आहे, सिग्नल सुरू असला तरी पुढे चला, अशा रितीने साहेबांनी कधीही सिग्नल तोडल्याचे आम्ही पाहिलेलं नाही. विमानानं प्रवास करायचा असेल तर विमान सुटण्यापूर्वी किमान वीस मिनिटं आधी आम्ही विमानतळावर पोहोचायचो. आम्ही धावत गेलो आणि आमच्यासाठी विमान थांबलंय, असं एकदाही झालं नाही. विमानतळावर उतरल्यावर गाडीत बसताना साहेब कटाक्षानं विचारायचे. “तुम्हाला गाडी आहे का?’ किती छोटी गोष्ट, पण आपल्यासोबत असलेल्या माणसांची गैरसोय होऊ नये, यासाठी नेहमी आपुलकीनं विचारतात.
कोणतीही बैठक असली, तर त्या बैठकीला उपस्थित राहून साहेब ती बैठक कशी हाताळताहेत, बोलताहेत ते पाहायला मला आवडायचं. शेतीचा, दुष्काळाचा किंवा कोणताही कठीण प्रसंग असला तरी सर्वांची बाजू ऐकून घेऊन नेमकेपणानं त्यावर साहेब समाधानकारक असा निर्णय घ्यायचे आणि बैठक वेळेत संपायची. कोल्हापूर इथल्या राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण कार्यक्रमात केलेल्या कामाबद्दल 2008 मध्ये मला पंतप्रधान पुरस्कारानं गौरविण्यात आलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी साहेबांना भेटायला गेलो. साहेबांना मी पुरस्कार मिळाल्याचं सांगितलं. त्यावेळी साहेब म्हणाले, “तुम्हाला पुरस्कार मिळाल्याचं मी टीव्हीवर लाईव्ह कार्यक्रमात पाहिलं.
त्या समारंभातलं (तत्कालीन) पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचं भाषण मला ऐकायचं होतं; पण संसदेत माझ्या विभागाचा प्रश्न पुकारला गेल्यामुळं मी ते ऐकू शकलो नाही.’ एवढे व्यग्र असतानाही मला पुरस्कार मिळालेला समारंभ त्यांनी पाहिला आणि त्याबद्दल अशी प्रतिक्रिया देऊन त्यांनी आम्हा दोघांना आश्चर्याचा सुखद धक्काच दिला.
त्या काळात कोकणातली बहुतांश जनता मुंबईवर म्हणजे नोकरीवर पूर्णपणे अवलंबून असायची. कोकणामध्ये निसर्गाची संपन्नता आहे. पाऊस चांगला असतो. या साऱ्या गोष्टींचा विचार करून शेतकऱ्यांच्या शेतीत फळबागांसंबंधी योजनेचा निर्णय साहेबांनी घेतला. त्या निर्णयाचा परिणाम म्हणून कोकणात हजारो एकरावर आंबा, काजू व इतर फळांच्या बागा उभ्या राहिल्या आणि कोकणातून मुंबईत जाणारा बेरोजगारांचा लोंढा कोकणच्या दिशेने परत फिरताना दिसू लागला. या संदर्भातला एक किस्सा मला आठवतो. मी मुख्य कार्यकारी अधिकारी असताना सुनील गावसकरांच्या घरी वेंगुर्ल्याला जाण्याचा योग आला.
तिथल्या लोकांना विचारलं की, तुमच्या गावात एवढं सुंदर आणि मोठं मंदिर कसं काय? लोकांनी सांगितलं की, आंब्याच्या आणि काजूच्या प्रत्येक पेटीमागे दोन रुपये आम्ही आकारतो. त्यातून जमा झालेल्या निधीतून गावासाठी आम्ही हे सुंदर मंदिर उभारलंय. पुढे उत्सुकतेतेने अधिक खोलात जाऊन विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की, गावातून आंबा आणि काजूमधून तीन कोटी रुपयांचं उत्पन्न मिळतं आणि गावातील अनेक मुलं व बाहेरचे लोक आता गावामध्येच काम करतात. रोजगारासाठी बाहेर जाण्याचं प्रमाण खूप कमी झालंय. साहेबांनी फळबाग योजना राबवण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचे हे दूरगामी परिणाम आम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळाले.
पुण्याचा जिल्हाधिकारी म्हणून कधी अचानक काही विषयांसंबंधी साहेबांना भेटायला जायचो. चिठ्ठी पाठवल्यानंतर कितीही गर्दी असली तरी साहेब एका मिनिटात बोलवायचे. हे केवळ माझ्याबाबतीतच नाही, तर इतर अधिकाऱ्यांच्या बाबतीतही ते असंच करायचे; पण त्यांची एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, भेटायला आलेले शासकीय अधिकारी जास्त वेळ थांबले की, त्यांना कामांसाठी भेटायला आलेल्या नागरिकांना ताटकळत राहायला नको, त्यांना उशीर व्हायला नको, म्हणून अधिकाऱ्यांना कोणत्याही विलंबाविना ते लगेच बैठकीसाठी, भेटीसाठी वेळ देत. हा दृष्टिकोन मला नेहमी इतरांपेक्षा वेगळा वाटायचा.
साहेबांच्याकडे काम करण्याचा प्रचंड “स्टॅमिना’ आहे. आम्ही तिघं खाजगी सचिव म्हणून काम करायचो. साहेबांचा दिवस सकाळी साडेसातला सुरू व्हायचा आणि रात्री साडेनऊ-दहाला संपायचा. त्यानंतर जेवण करून साहेब फायली तपासायचे. ते रात्री उशिरापर्यंत हातातले काम संपवत. साहेबांकडे गेलेल्या फायली दोन दिवसांच्या वर प्रलंबित राहिलेल्या नाहीत. एवढा प्रचंड जनसंपर्क, कामाचा व्याप असताना त्यांची निर्णयक्षमता किंवा गतीनं काम करण्याची पद्धत आम्हा सर्वांना धडा देणारी होती.
सौ. वहिनीसाहेब नेहमीच आम्हाला घरातल्या सदस्यांसारखी वागणूक देत. कधी कधी मोठ्या दौऱ्यावर असताना एकट्यालाच सकाळ ते संध्याकाळपर्यंत काम करायला लागायचं. ते पाहून आमच्याबद्दल विचारपूस करायच्या. हा आपलेपणा, जिव्हाळा आणि त्यांचं साधेपणानं राहणं मनावर कायम कोरलेलं आहे. साहेबांकडे काम करणं, साहेबांचं बोलणं, वागणं, पाहणं ही एक पर्वणीच असते. शिकण्याची खूप मोठी संधी असते; किंबहुना त्यांच्या सहवासात राहण्याचे प्रसंग सतत यावेत, इतक्या मोठ्या व्यक्तीला जवळून पाहायला मिळावं, असं सातत्यानं वाटतं.
कोल्हापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना शैक्षणिक गुणवत्तवाढीचा कार्यक्रम तयार केला होता. त्या मसुद्याचं मी साहेबांपुढे प्रेझेंटेशन दिलं.
साहेबांनी पाहिल्यानंतर काही सूचना दिल्या आणि उठताना म्हणाले की, दोन वर्षांनंतर केलेल्या कामाचं बाहेरच्या एजन्सीकडून “थर्ड पार्टी व्हॅल्युएशन’ करून घ्या. साहेबांनी सांगितल्याप्रमाणं मी “इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, पुणे’ या संस्थेकडून स्वतंत्रपणे मूल्यांकन करून घेतलं. ज्यावेळी तो शैक्षणिक गुणवत्तावाढीचा प्रकल्प पंतप्रधान पुरस्कारासाठी पाठवला, त्यावेळी या मूल्यमापनाच्या निरीक्षणांच्या आधारावरच माझ्या प्रकल्पाची पंतप्रधान पुरस्कारासाठी निवड झाली. यातून साहेबांची “वेगळी’ दूरदृष्टी पाहायला आणि अनुभवायला मिळाली.
साहेब केंद्रीय कृषिमंत्री असताना देशभरात कमी पाऊस झाला होता आणि दुष्काळी परिस्थिती होती. दोन दिवस देशपातळीवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सर्व राज्यांचे कृषिमंत्री, कृषी सचिव, कृषी आयुक्तांना आमंत्रित करण्यात आले होते. साहेब त्या कार्यशाळेला दोन दिवस उपस्थित होते. विविध राज्यांमध्ये शेतीची आणि तिथल्या पावसाची परिस्थिती वेगळी होती. दोन दिवसांच्या सगळ्यांच्या सूचना विचारात घेऊन उत्पादनवाढीचा विशेष कार्यक्रम त्या कार्यशाळेतच साहेबांनी जाहीर केला आणि संपूर्ण देशामध्ये कमी पाऊस असतानाही अन्नधान्याचं नेहमी सरासरी जेवढं उत्पन्न येतं, त्यावर्षी तेवढ्या उत्पन्नाची पातळी देशानं गाठली.
अत्यंत कठीण परिस्थितीत सर्वांशी चर्चा करून संबंधित विषयावर निर्णय घ्यायचा, त्याची अंमलबजावणी करायची आणि यशस्वीरित्या ते काम पूर्ण करायचं, हे कसब मी केवळ साहेबांमध्ये पाहिलं. अधिकाऱ्यांचं मत जाणून घेणं, त्यांच्या मतांना योग्य किंमत देणं, केवळ लोकाग्रह म्हणून नाही तर भविष्यात एखादा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ठामपणे निर्णय घेणं, हे साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. अशा या आगळ्यावेगळ्या अष्टपैलू, दूरदर्शी व्यक्तिमत्त्वाच्या साहेबांना वाढदिवसानिमित्त माझ्या मन:पूर्वक व आरोग्यसंपन्न शुभेच्छा!
माजी सचिव, जलसंधारण, रोजगार हमी योजना, महाराष्ट्र.