पाटणा – माजी केंद्रीय मंत्री शरद यादव बिहारच्या राजकीय रणांगणात एकाकी पडले आहेत. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय त्यांच्या लोकतांत्रिक जनता दलाने (लोजद) घेतला आहे. त्या राज्यातील विधानसभेच्या एकूण 243 पैकी 51 जागा लोजद लढवणार आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूचे अध्यक्षपद एकेकाळी यादव यांच्याकडे होते. मात्र, पुन्हा भाजपशी युती करण्याच्या नितीश यांच्या निर्णयावरून ते नाराज झाले. त्यांच्यातील मतभेद वाढल्याने यादव जेडीयूपासून दूर गेले.
त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी लोजदची स्थापना केली. यंदाच्या निवडणुकीत यादव राजद, कॉंग्रेस आणि इतर लहान पक्षांचा समावेश असणाऱ्या विरोधकांच्या महाआघाडीचा घटक बनतील, अशा अटकळी बांधल्या जात होत्या. मात्र, राजद आणि कॉंग्रेसने लोजदकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे यादव यांच्या लोजदला एकला चलो रे अशी भूमिका घेणे भाग पडले.
निवडणूक लढवण्यासंबंधीचा निर्णय घेण्यास त्या पक्षाला विलंब झाला आहे. त्याविषयीचे स्पष्टीकरण लोजदचे नेते अरूण श्रीवास्तव यांनी दिले. यादव यांची प्रकृती सध्या ठीक नाही. त्यामुळे निर्णय घेण्यास वेळ लागल्याचे त्यांनी नमूद केले.