पवारांसह 40 जणांची सुरक्षा केली कमी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील अनेक दिग्गजांची सुरक्षा व्यवस्था कमी केली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीतल्या निवासस्थानावरील सुरक्षा हटवण्यात आली आहे. शरद पवार यांच्यासह 40 जणांची सुरक्षा काढण्यात आली आहे. 20 जानेवारी पासून सुरक्षा रक्षक काढले आहे. सुरक्षा रक्षक कमी करण्याबाबत अधिकृत माहिती केंद्रीय गृहखात्याने दिलेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात शरद पवार यांना झेड सुरक्षा आहे. शरद पवार यांच्या दिल्लीतील घरी सहा जनपथला तीन गार्ड होते. जे शिफ्टमध्ये काम करत होते आणि एक PSO हा देखील होता. पण 20 तारखेपासून हे सुरक्षा रक्षक काढले. हे सुरक्षा रक्षक ड्युटीवर आले नाही. तेव्हा सुरक्षा कमी करण्यात आल्याचे लक्षात आले. सुरक्षा रक्षक कमी करण्याबाबत अधिकृत काहीच केंद्रीय गृहखात्याने कळवले नाही. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर शरद पवार यांची दिल्लीतील सुरक्षा हटवली? असा चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
काही दिवसांपूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सुरक्षाव्यवस्थेमधील कपातीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. सचिन तेंडुलकर यांना एक्स दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येत होती. मात्र एखाद्या व्यक्तीला दिली जाणारी सुरक्षा कायम स्वरुपाची नसते. वेळोवेळी त्याचा आढावा घेऊन सुरक्षेची श्रेणी बदलण्याचा अधिकार राज्य पोलिस प्रशासनाकडे असतो. त्यानुसार सचिनच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. मात्र ही सुरक्षा कायम ठेवावी, अशी विनंती सचिन तेंडुलकरने मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
केंद्र सरकारने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांची स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. त्यांना आता ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यात येणार आहे. म्हणजेच त्यांना सीआरपीएफचे सुरक्षाकवच असणार आहे.