सातारा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे राजकारण सर्वज्ञात असून त्यांनी काही दिवसांपूर्वी दिलेला राजीनामा म्हणजे राष्ट्रवादीची “स्क्रिप्ट’ होती, अशी टीका केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. देशात भाजपबाबत चांगले वातावरण असून भाजपच्या स्पर्धेत अन्य पक्षांच्या आघाड्या टिकणार नाहीत. राज्यात लोकसभा व विधानसभेच्या सर्व जागा भाजप जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अजयकुमार मिश्रा दोन दिवस सातारा दौऱ्यावर आले असून शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात श्री. मिश्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, “”राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढला असून त्यांचे अनेक आमदार चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. शरद पवार यांनी पक्षातील बंडाळी रोखण्यासाठी राजीनाम्याचे अस्त्र वापरल्याचे बोलले जात आहे. त्यांचा राजीनामा म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्क्रिप्ट होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात भाजपला चांगले वातावरण आहे. महाराष्ट्रातही सत्ता बदलानंतर विकासाची गंगा सुरु झाली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यात येत आहेत.”
खासदार ब्रिजभूषण यांच्याबाबत असलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याची चौकशी सुरु आहे. चौकशीअंती सत्य उजेडात येईल. चौकशीविना कोणावर कारवाई करणे उचित होणार नाही. अन्य पक्षांच्या तुलनेत भाजपमध्ये गुन्हेगार खासदार, आमदारांची संख्या कमी आहे. केंद्रातील भाजप सरकार चुकीचे वागणाऱ्या कोणालाही सोडत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. देशभरात प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री सडक योजना, जलजीवन मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. “हर घर जल’च्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला नळ कनेक्शन देऊन जलक्रांती करण्यात आली.
“मन की बात’च्या माध्यमातून पंतप्रधान मोदी जनतेशी संवाद साधत असून देशात भाजपला चांगले वातावरण असून आगामी निवडणुकांमध्ये भाजपला जास्तीत जास्त जागा मिळतील, असा विश्वास श्री. मिश्रा यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेस खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे नरेंद्र पाटील, विक्रम पावसकर, ऍड. भरत पाटील, डॉ. अतुल भोसले, धैर्यशील कदम, विकास गोसावी, सागर शिवदास आदी उपस्थित होते.