मुंबई: त्रिपुरातील घटनांच्या निषेधार्थ येथील मुस्लिम संघटनांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चादरम्यान दगडफेक, मारहाण करण्यात आली, त्याचा निषेध नोंदवण्यासाठी भाजपने शनिवारी ‘अमरावती बंद‘ पुकारला. त्याला हिंसक वळण लागले. दोन्ही गट समोरा समोर आल्याने दंगल सदृश स्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केले आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पवार सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पवार म्हणाले, महाराष्ट्रात काही संघटना अशा घटनांना खतपाणी घालतात हे योग्य नाही. राज्यातील काही मोजक्या भागात या घटना घडल्या. या प्रवृत्तींना किती महत्त्व द्यायचं, हे लोकांनी ठरवावं.
राज्य सरकार चांगलं काम करत असतांना तीन, चार राज्यांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हे जाणीवपूर्वक केलं गेलं आहे. राज्य सरकार चांगलं काम करताना बंदचा निर्णय, नैराश्यातून सामाजिक शांततेला धक्का बसेल असं काम काही राजकीय पक्षांचे घटक करतायत हे दुर्दैवी आहे.