सोलापूर: देशाची सूत्रे अपघाताने नरेंद्र मोदींच्या हातात गेली आणि देशाला त्यांनी पाच वर्षात कुठे नेऊन ठेवले हे न बोललेले बरे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठविली. सोलापूर लोकसभेचे कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ बुधवारी सकाळी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात पवार बोलत होते.
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. दरम्यान राजकीय पक्षानी प्रचाराला सुरवात जोरदार केली आहे. यावेळेस भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे सोलापुरातील उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महाराजांना चांगलाच टोला लगावला.
शरद पवार म्हणाले, साधू संत कधी कोणाकडे मागत नाहीत, मागणारा संत असूच नाही. सोलापुरात मला मताचा शिक्का द्या म्हणणारा महाराज मी देव आहे, असे सांगत असल्याचे वाचले. राजकारण हे महाराजांचे काम नाही व ही भोंदुगिरी समाज आणि देशाच्या हिताची नाही. त्यामुळे अशा महाराजांना सांगू या, महाराज नमस्कार, ही पाच रुपयाची नोट घ्या आणि मठात जाऊन बसा. राजकारण हे तुमचे काम नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. सोलापूरचे काँग्रेस राष्ट्रवादीचे आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदेंच्या प्राचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.